महाड प्रतिनिधी
साडेतीनशे वर्षां पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा झालेला राज्याभिषेक हा आज केवळ राज्याभिषेक सोहळा राहिला नसून तो लोकोत्सव झाल्याचे प्रतिपादन रायगड प्राधिकरणचे अध्यक्ष माजी खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी किल्ले रायगडावर आज संपन्न झालेल्या (तारखेनुसार ) छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोहळ्या प्रसंगी केले, यावेळी उपस्थित लाखो शिवभक्तांना मार्गदर्शन करताना त्यांनी शासनाने राज्यातील ५० किल्ले आपल्या ताब्यात द्यावेत शासनाकडून यासंदर्भात संवर्धनासाठी एक रुपयाही न घेता आम्ही स्वखर्चाने या किल्ल्यांचे संवर्धन करू असे सुचित केले, छत्रपतींची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडाचा ताबा देखील केंद्रीय पुरातत्त्व खात्याने रायगड प्राधिकरणाकडे द्यावा अशी आग्रही मागणी त्यांनी राजदरबारातून शासनाकडे केली.
शिवराज्याभिषेक समितीमार्फत आयोजित करण्यात आलेल्या तारखेनुसार च्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी संपूर्ण देशभरातून सुमारे ४ लाख शिवभक्त उपस्थित होते .
सकाळी राजदरबारात सुरू झालेल्या या मुख्य सोहळ्या दरम्यान आमदार रोहित पवार ,आमदार अनिकेत तटकरे, आमदार बंटी उर्फ सतेज पाटील, महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप कामत, शिवराज्याभिषेक समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत, यांसह सर्व पदाधिकारी शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. आपल्या भाषणामध्ये संभाजी राजे यांनी छत्रपतींचे विविध गुण आपल्या जीवनामध्ये यायला हवेत असे स्पष्ट करताना छत्रपती शिवाजी महाराजांचे दोन टक्के गुण जरी आपणामध्ये आले तरी जीवन सार्थक झाले असे म्हणावे लागेल . छत्रपतींच्या काळातील मावळा सरदार सरसेनापती व अष्टप्रधान मंडळामध्ये देखील येऊ शकतो हा विश्वास त्यांनी आपल्या मावळ्यांमध्ये रुजविला होता असे अशा विचारांचा महाराष्ट्र घडवायचा असून शासना मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चार दिवसांपूर्वीच पाचाड येथे शिवसृष्टी निर्मितीसाठी ५० कोटी रुपये घोषित केल्याचा उल्लेख करून त्याचे स्वागत करतानाच यावेळी राज्यांच्या शिवकाळातील ३०० किल्ल्यांबाबत विचार करणे अपेक्षित होते असे मत व्यक्त केले. शासनाकडून एक रुपयाही न घेता ५० किल्ले आम्हाला दत्तक द्यावेत त्याचे संवर्धन आम्ही करू असे त्यांनी जाहीर केले. शिवभक्त जनता व मावळे मागे राहणारे नाहीत असे सांगताना ते पुढे म्हणाले ज्याप्रमाणे लाखोंच्या संख्येने आपण किल्ले रायगडावर जल्लोषामध्ये उपस्थित राहिला, या ऐतिहासिक लोकोत्सवाचे स्मरण ठेवत घरी जाताना सर्व सूचनांचे पालन करीत पोलीस आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच किल्ले रायगडावर गेल्या चार दिवसापासून शाहिरी मर्दानी आखाडे सांस्कृतिक कलाकार यांनी सादर केलेली लोककला सादर करणाऱ्या कलाकारांनी एक रुपयाही मानधन घेतलेले नाही असे सांगून यापेक्षा शिवभक्त अजून बरेच देऊ शकतो असे ते म्हणाले.
सन २००७ साली तारखेनुसार हा सोहळा आपण सुरू केला त्या वेळेला काही हजार शिवभक्त होते आज चार लाख शिवभक्त किल्ल्यावर व किल्ल्याच्या खाली उपस्थित असल्याचे त्यांनी सांगितले किल्ले रायगडावर रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून चांगली कामे केली जात असून पुढील वर्षी पाणीटंचाई संदर्भात कोणतीही समस्या शिल्लक राहणार नाही त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमदारांनी येथील विविध समस्या सोडवण्यासाठी सहकार्य करावे शिवभक्त त्याला संपूर्ण सहकार्य देतील असा विश्वास व्यक्त केला.