कुडची येथील फळ विक्रेत्याला दीड लाखाचा फटका : सीईएन पोलिसांकडे फिर्याद दाखल
प्रतिनिधी /बेळगाव
लष्करातून बोलत आहे आम्हाला दोन टन द्राक्षे हवी आहेत, ती तुम्ही पाठवून द्या, असे मोबाईलवरून सांगून द्राक्ष व्यावसायिकाला 41 हजार रुपयाची टोपी घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महत्त्वाचे म्हणजे भामटय़ाने बेळगाव येथील लष्करामधून मी बोलत आहे, असे सांगून फसविल्यामुळे खळबळ उडाली आहे. या फसवणुकीनंतर त्या द्राक्षे व्यावसायिकाने सीईएन पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे.
कुडची (ता. रायबाग) येथील फळ विक्रेते सर्फराज अब्दुलखादर शेख यांना लष्करातून बोलत आहे, आम्हाला दोन टन द्राक्षे हवीत, तेव्हा द्राक्षे पाठवून देता का? असे विचारले. सर्फराज हे पूर्वी लष्कराला फळे पाठवत होते. त्यामुळे त्यांना त्यावर विश्वास बसला तरीदेखील त्यांनी दोन दिवस टाळाटाळ केली. मात्र मी लष्करातून बोलत आहे, माझ्यावर विश्वास ठेवा, असे सांगून सर्फराज यांना त्या भामटय़ाने विश्वासात घेतले.
सर्फराज हे फळे खरेदी करून होलसेल मार्केटमध्ये पाठवत असतात. मात्र यावेळी लष्कराच्या अधिकाऱयांनी फोन केल्यामुळे त्यांनी विविध ठिकाणी फिरून द्राक्षे खरेदी केली. त्यानंतर अशोक लेलँड ट्रकमधून बेळगावला पाठवून दिली. त्यावेळी चालकाला ज्या व्यक्तीने फोन केला होता त्या व्यक्तीचा फोन क्रमांक दिला. चालक सुरेश हा बेळगावात आल्यानंतर त्याने फोन करून बेळगावात आल्याचे सांगितले. त्यावर त्या व्यक्तीने तुम्ही कोणत्या गेटकडे उभे आहात म्हणून त्या भामटय़ाने चालकाला विचारले. त्यावेळी त्या चालकाने गेट क्रमांक एककडे असल्याचे सांगितले.
20 हजार रुपये केले ऑनलाईन जमा
त्यानंतर भामटय़ाने अत्यंत चालाखीने चालकाच्या फोनवर आपल्या सहकाऱयाला फोन करायला सांगून चालकाला बोलण्यात गुंतविले. त्याचवेळी फळ विक्रेते सर्फराज यांना भामटय़ाने फोन केला. तुमचा ट्रक येथे आला आहे. मात्र, वाहनाला गेटमधून प्रवेश करावयाचा असेल तर 20 हजार रुपये तुम्ही ऑनलाईनद्वारे जमा करा असे सांगितले. त्यावर सर्फराज यांनी तुम्ही पहिला ही माहिती का दिला नाही? मी रोख रक्कम पाठविली असती, असे सांगितले.
मात्र त्या भामटय़ाने अत्यंत चालाखीने मी लष्करात आहे, मी खोटे बोलणार नाही, माझ्यावर विश्वास ठेवा आणि तुमच्या बँक खात्यामधून 20 हजार रुपये ऑनलाईनद्वारे पाठवा, अन्यथा तुमची ट्रक गेटमधून आत सोडली जाणार नाही, असे सांगितले. त्यामुळे सर्फराज यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. त्या भामटय़ाने आपल्या अकाऊंटमधून गुगल पे द्वारे सर्फराज यांना 2 रुपये देखील पाठवून दिले. त्यामुळे सर्फराज यांनी गुगल पे द्वारे 20 हजार रुपये पाठविले.
सदर रक्कम पाठविल्यानंतरच काही वेळातच फोन करून तुम्ही पाठविलेली रक्कम मिळाली आहे. तुमचा ट्रक गेटमधून आत सोडण्यात आला आहे. मात्र तुम्हाला पिनकोड पाठविला आहे. तो ओपन करा असे सांगितले. 2100 असा पिनकोड क्रमांक पाठविला. तो क्रमांक ओपन करा, असे सांगितले. सर्फराज यांनी तो क्रमांक ओपन केल्यानंतर पुन्हा अकाऊंटमधील 21 हजार रुपये कमी झाले. यामुळे आपण फसलो गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी त्या भामटय़ाला फोन केला असता तुमच्या ट्रकला आत प्रवेश दिला आहे, असे सांगितले. मात्र, काही वेळानंतर त्या भामटय़ाचा फोन स्वीच ऑफ असल्याचे आढळून आले.
द्राक्षे विकावी लागली कमी दरानs
सर्फराज यांनी नंतर फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या भामटय़ाने फोन बंद केल्यामुळे संपर्क होऊ शकला नाही. या घटनेमुळे त्यांना धक्काच बसला आहे. 41 हजार रुपये बँक खात्यातील भामटय़ाने घेतले. सध्या द्राक्षांचा दर देखील अधिक असल्याने द्राक्षे खरेदी करतानाही मोठी रक्कम गुंतवावी लागली होती. ते द्राक्षे खपविल्याशिवाय पर्याय नव्हता. काही बेळगावमधील होलसेल विक्रेते तसेच हुबळी येथील विक्रेत्यांना द्राक्षे कमी दराने विकण्यात आले. त्यामुळे त्यामध्ये देखील जवळपास 1 लाखाचा फटका त्यांना बसला आहे. या घटनेनंतर त्यांनी तातडीने सीईएन क्राईम पोलिसांकडे फोन क्रमांकासह तक्रार नोंदविली आहे.
यापूर्वी लष्कराला पुरवठा केल्यामुळे बसला विश्वास
सर्फराज यांनी अनेकवेळा लष्कराला फळे पुरवठा केली आहेत. काही लष्करी अधिकारी त्यांना फोन करून फळे मागवत होते. त्यामुळे भामटय़ांनी केलेल्या फोनवर त्यांचा विश्वास बसला. भामटय़ाने बोलताना कॅम्प परिसरातील पत्ता देखील योग्य दिला होता. यामुळेच सर्फराज यांना त्या भामटय़ांच्या बोलण्यावर विश्वास ठेवावा लागला. या घटनेनंतर मोबाईल क्रमांक तपासला असता रणदीपसिंग या नावाने मोबाईल क्रमांक असल्याचे आढळून आले. तर फेडरल बँकेचे खाते असून संजयसिंग यांच्या नावाने असल्याचे दिसून येत आहे.
चालकालाही फोनवर गुंतविले
सदर भामटे हे हरियाणा येथील असल्याचे फोन क्रमांकावरून समजून येत आहे. मात्र, त्या भामटय़ाने सर्फराज यांच्या वाहनाच्या चालकालाही फोनवर गुंतवून ठेवण्याचा प्रताप केला आहे. सर्फराज हे चालक सुरेश याला फोन करत होते. मात्र चालकाचा फोन बिजी लागत होता. यामुळे त्या भामटय़ांनी किती मोठय़ा चलाखीने सर्फराज यांना फसविल्याचे दिसून येत आहे.
कुडचीसह इतर भागात फिरून जमा केले द्राक्षे…
सध्या द्राक्षांचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे दोन टन द्राक्षे जमविणे मोठे कसरतीचेच काम होते. सर्फराज यांनी रायबाग, चिकोडी, तालुक्यातील अनेक गावांमध्ये जाऊन ती द्राक्षे खरेदी केली होती. केवळ लष्कराला द्राक्षे द्यायची आहेत म्हणून त्यांनी ही जबाबदारी घेतली. मात्र, लष्कराच्या नावाखालीच आपली फसवणूक झाल्यामुळे त्यांना चांगलाच धक्का बसला आहे.