ग्रामस्थ हैराण, वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी 7 दिवसांची मुदत
वाळपई : नगरगाव ग्रामपंचायत क्षेत्रातील ब्रम्हकरमळी, शेळप, शिंगणे या भागात वीज पुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने ग्रामस्थ हैराण झाले असून वीज खात्याने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी नागरिक समितीने केली आहे. यासंबंधी एक निवेदन नागरिक समितीच्या वतीने सागर प्रभू देसाई यांच्या नेतृत्वाखाली वाळपई वीज खात्याचे साहाय्यक अभियंता दीपक गावस यांच्याकडे सादर करून खात्याला सात दिवसांची मुदत दिली आहे. यावेळी आदित्य देसाई, पांडुरंग सावंत, अमर नागवेकर, मोहन गावडे, आदेश यत्रेकर हे समिती सदस्य उपस्थित होते. नगरगाव भागातील ब्रह्मकरमळी, शेळप, शिंगणे या भागात सध्या वेळोवेळी वीज खंडित होत आहे. या संबंधी नुकतीच नागरिक समितीची बैठक होऊन खात्याला प्रथम निवेदन देऊन प्रथम दुऊस्तीसाठी अवधी देण्याचे ठरले. दिलेल्या अवधीत समस्या न सुटल्यास वीज खात्याला नागरिकांच्या रोशाला सामोरे जावे लागेल असा इशारा नागरिक समितीच्यावतीने सागर प्रभुदेसाई यानी दिला. सध्या परिस्थितीतवीज पुरवठा खंडित झाला तर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. सध्या उष्णतेचे दिवस व तापमानात वाढ होत असल्यानेव त्यात वीज जाणे म्हणजे जीवन जगणे असह्य होते. यासाठी तातडीने लक्ष देण्याची मागणी मोहन गावडे, अमर नागवेकर यांनी केली. निवेदनाची एक प्रत आरोग्य मंत्री तथा वाळपई आमदार विश्वजित राणे यांच्या कार्यालयामध्ये सादर केली आहे. वाळपई वीज विभागामध्ये सुमारे 45 कामगारांची गरज आहे. तसेच 3 कनिष्ठ अभियंताना मामलेदार कार्यालयाकडून सर्वेचे काम दिले गेले असल्याने याचा परिणाम वीज खात्याच्या कारभारावर होत आहे. हा प्रकार नागरिक समिती आरोग्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे सागर प्रभुदेसाई यांनी यावेळी सांगितले. यावेळी शिष्टमंडळाला उत्तर देताना साहाय्यक अभियंता दीपक गावस यांनी येत्या 7 दिवसात वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी खात्याच्यावतीने प्रयत्न केले जाणार असल्याचे आश्वासन दिले.