अध्याय एकोणीसावा
भगवंत म्हणाले, भारतीय युद्ध संपल्यावर धर्मराज आपल्या आप्तेष्टांच्या संहाराने शोकविह्वळ झाला होता, तेव्हा त्याने भीष्मांकडून धर्माचे पुष्कळ विवरण ऐकल्यानंतर, मोक्षाच्या साधनांसंबंधी प्रश्न विचारला होता. हा प्रश्न विचारायचे प्रमुख कारण म्हणजे, देहबुद्धी वाढल्यामुळे तो भारतीय महायुद्धात जो नरसंहार झाला त्याला आपणच कारणीभूत आहोत असे त्याला वाटू लागले होते. खरं म्हणजे युद्ध सुरु होण्याच्या आधी मी उभयतात संधी करण्यासाठी गेलो होतो पण दुर्योधनाने ते मानले नाही. व्यासांनीही त्याचा निषेध केला तरी तो गर्वाने युद्धालाच तयार झाला. तात्पर्य, दैवयोगाने कुरुक्षेत्रामध्ये कौरवपांडवांच्या युद्धात दुर्योधनादि सापत्न वैरी सहपरिवार मारले गेले. युद्ध समाप्त झाल्यानंतर धर्मराज राज्यपदारूढ झाला, तेव्हा त्याच्या अंतःकरणात देहाभिमान उत्पन्न झाला. तो स्वतःला कर्ता समजू लागला त्यामुळे त्याला वाटू लागले की, पृथ्वीमध्ये महापातकी असा काय तो मीच एक होय. मी त्याला राज्यावर बसविल्यानंतर तो म्हणाला, मी माझ्या ब्राह्मणगुरूला मारले, कर्णदुःशासनाला मारले व राजा दुर्योधनालाही मीच मारले. प्रत्यक्षात उत्पत्ती, स्थिती व प्रलयकर्ता एक ईश्वरच असताना ते सारे सोडून देऊन धर्मराज ह्या साऱयाचा कर्ता काय तो मीच असे म्हणू लागला.
देहाभिमानाच्या यातायातीत गुंतून मोठय़ा पश्चात्तापाने, आपल्याच कुलगोतांचा घात करणारा असे महापातकी आपणच आहोत, असा आरोप त्याने आपल्या माथ्यावर घेतला. तेव्हा त्याचे समाधान करण्यासाठी भीष्मांच्या निर्याणाची संधी साधून मी त्याला त्यांच्याकडे नेले व त्यांनाच त्याच्याकडून प्रश्न करविले. ते धर्माने केलेले प्रश्न आता ऐक. त्याने राजधर्म विचारला, दानधर्म विचारला, आपद्धर्म विचारला व मुख्यत्वेकरून उत्तमोत्तम असा मोक्षधर्मही विचारला. तोच आता ऐक. त्यावेळी भीष्मांच्या तोंडून ऐकलेले धर्म मी तुला सांगतो ते ज्ञान, वैराग्य, विज्ञान, श्रद्धा आणि भक्तीने परिपूर्ण आहेत. उत्तरादाखल भीष्माच्या मुखातून निघालेले अतिउत्तम असे मोक्षधर्म मी श्रवण केले. त्यांच्या योगाने संसाराचा भ्रम दूर होतो व सर्व कर्म दग्ध होऊन जाते. ज्ञान, विज्ञान, श्रद्धा, भक्ती, अनित्याचा नाशवंतपणा व वैराग्यस्थिती इत्यादींविषयी भीष्मांनी धर्माला सांगितले. तेच मी तुला यथार्थ रीतीने सांगतो. भीष्माला ‘देवव्रत’ असे म्हणतात. याचे कारण देवावरच चित्त ठेवून, निश्चयपूर्वक आत्मानुसंधान धरून, स्वस्थ अंतःकरणाने तो शरपंजरावर पहुडला होता. त्याने मोक्षधर्म सांगितला. त्यात मुख्यत्वेकरून प्रथम ‘ज्ञान’ सांगितले. तेच अत्युत्तम ज्ञान पुरुषोत्तम सांगत आहेत. ते म्हणाले, उद्धवा ! ज्या ज्ञानाने, प्रकृती, पुरूष, महत्तत्त्व, अहंकार आणि पंचतन्मात्रा ही नऊ, पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मेंद्रिये आणि एक मन ही अकरा, पाच महाभूते आणि तीन गुण ही आठ, अशी ही एकूण अठ्ठावीस तत्त्वेच सर्व कार्यांमध्ये आहेत, तसेच या सर्वांमध्ये एकच परमात्मतत्त्व व्यापून आहे, हे लक्षात घेतले जाते, तेच परोक्ष ज्ञान होय, हे माझे निश्चित मत आहे. प्रकृती, पुरुष, महत्तत्त्व, पंचतन्मात्रा म्हणजे पाच सूक्ष्म भूते आणि अहंकार ही सारी मिळून ‘नऊ’ तत्वांची संख्या आहे. ‘अकरा’ असे जे म्हणतात, ती पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मेंद्रिये व एक मन आणि ‘पांच’ म्हणजे पंचमहाभूते होत आणि ‘तीन’ म्हणजे सत्व, रज व तम हे तीन गुण होत. ही सर्व तत्त्वांची संख्या एकत्र केली म्हणजे ‘अठ्ठावीस’ होते. ही सर्व तत्त्वे सर्व प्राणिमात्रांमध्ये समसमान भावाने वागत असतात. ब्रह्मदेवापासून तो स्थावरापर्यंत ही सर्व तत्त्वे सर्वामध्ये सारखी भरलेली आहेत. उद्धवा ! यात खरोखर एकही अधिक किंवा उणे होत नाही, हे लक्षात ठेव. त्याचप्रमाणे ‘जीवचैतन्य’ हेही समसमानच प्रतिबिंबित झालेले आहे. आणि तेच सर्वाचे नाम, रूप व अभिमान ह्यास प्रकाशित करते. डबक्मयामध्ये, विहिरीमध्ये किंवा समुद्रामध्ये चंद्राचे प्रतिबिंब सारखेच असते त्याप्रमाणे महादेवापासून तो माशीपर्यंत सर्वांच्या शरीरात जीवपणा हाही सारखाच असतो.