रस्त्याशेजारी-गटारीत कचरा टाकण्याचे प्रमाण वाढल्याने स्वच्छतेचा बोजवारा
प्रतिनिधी/बेळगाव
शहरातील कचऱयाची उचल करण्यासाठी वर्षाला 25 कोटींहून अधिक निधी खर्च केला जातो. घरोघरी जाऊन कचऱयाची उचल करूनही शहरातील रस्त्याशेजारी किंवा खुल्या जागेत कचरा टाकण्यात येत आहे. त्यामुळे घरोघरी जाऊन कचरा जमा करण्याचे कामकाज व्यवस्थित होते का? असा मुद्दा उपस्थित झाला आहे. तर स्वच्छता कामाचे नियोजन पूर्णपणे बारगळले असून स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे.
शहरातील विविध ठिकाणी कचराकुंडय़ा ठेवून कचऱयाची उचल केली जात होती. मात्र सार्वजनिक ठिकाणी कचरा जमा करून ठेवणे हे शहरवासियांच्या आरोग्यास धोकादायक आहे. तसेच पर्यावरण दूषित होत असल्याने थेट घरातूनच कचऱयाची उचल करण्याची योजना स्वच्छ भारत मिशन योजनेंतर्गत राबविण्यात येत आहे. याकरिता महापालिकेने घरोघरी जाऊन कचरा जमा करण्यासाठी घंटागाडीची सोय केली होती. पण ही योजना निष्फळ ठरल्याचे चित्र शहरातील अस्वच्छतेमुळे निदर्शनास येत आहे. घरोघरी जाऊन कचरा जमा करण्यासाठी स्वच्छता कामगार आणि घंटागाडीची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. मात्र शहराची व्याप्ती वाढल्याने घंटागाडीद्वारे कचरा जमा करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे लहान ऑटोटिपर आणि लहान टेम्पोद्वारे दररोज कचरा जमा करण्याचे काम सुरू करण्यात आले होते.
नियमित उचल नसल्याने कचरा रस्त्यावर टाकण्याचे प्रमाण वाढले
कचरा घेण्यासाठी येणारे वाहन नियमितपणे येत नसल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी कचरा घरात साचवून ठेवावा लागत आहे. सलग दोन दिवस कचरा घेणारे वाहन आले नसल्यास नागरिकांच्या घरामध्ये साचविलेला कचरा कुजून दुर्गंधी पसरत आहे. तसेच दररोज घर स्वच्छ ठेवणारे नागरिक कचरा घरात ठेवत नाहीत. त्यामुळे रस्त्याशेजारी अथवा खुल्या जागेत कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. कचरा जमा करण्यासाठी वर्षाला 360 रुपये आकारले जाते. सदर रक्कम घरपट्टीच्या माध्यमातून वसूल केली जाते. तरीदेखील कचऱयाची उचल मात्र वेळेवर केली जात नाही. त्यामुळे नागरिक रस्त्याशेजारी कचरा टाकत असल्याचे निदर्शनास आले आहे. कचऱयाची उचल नियमितपणे करून देखील काही नागरिक कचरा रस्त्यावर टाकत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे परिसर स्वच्छ ठेवण्याच्या दृष्टीने महापालिकेकडून दंडात्मक कारवाई केली जाते. पण दंड करूनही नागरिक रस्त्याशेजारीच कचरा टाकत आहेत. कचरा कर्मचाऱयांकडे देण्याऐवजी रस्त्याशेजारी टाकण्याचे प्रयोजन काय? असा मुद्दा उपस्थित होते. कचरा घेण्यासाठी स्वच्छता कामगार वेळेवर येत नसल्यानेच असे प्रकार घडत असल्याची टीका नागरिक करीत असतात. पण नागरिक आणि मनपा स्वच्छता कामगारांच्या बेजबाबदारपणे शहरात दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण होत आहे.
शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी नेमकी कुणाची?
स्वच्छतेसाठी निधी खर्च करूनही संपूर्ण शहर अस्वच्छ राहत आहे. काही अपार्टमेंटमध्ये कचरा जमा करण्यासाठी कचराकुंडय़ा ठेवल्या जातात. पण कचऱयाची उचल केली जात नसल्याने नागरिक कचरा रस्त्याशेजारी टाकत असतात. रात्रीच्यावेळी किंवा सकाळी फिरायला जाणारे नागरिक घरातील कचरा रस्त्याशेजारी टाकताना निदर्शनास येते. स्वच्छतेसाठी महापालिकेने कोटय़वधी निधी खर्च करून अत्याधुनिक पद्धतीची उपकरणे, वाहने खरेदी केली आहेत. तरीदेखील शहर अस्वच्छतेच्या विळख्यात सापडले आहे. त्यामुळे महापालिकेचे पर्यावरण अभियंते, स्वच्छता निरीक्षक आणि स्वच्छता कामगार नेमके काय करतात? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. शहर स्वच्छतेची जबाबदारी नेमकी कुणाची? असा प्रश्न उपस्थित होत आहे.