कोल्हापुरात गायरान अतिक्रमण कारवाई विरोधात सर्वपक्षीय एकवटले
Kolhapur Gayran Encroachment : गायरानातील अतिक्रमणे काढण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णया विरोधात कोल्हापुरात आज सर्वपक्षीय एकवटत महामोर्चाचे आयोजन केले आहे. माजी मंत्री,आमदार सतेज पाटील य़ांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत असा धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी अतिक्रमण धारक आक्रमक झाले आहेत. ‘गायरान आमच्या हक्काच, नाही कुणाच्या बापच’ अशा घोषणा देत हा मोर्चा निघाला. या महामोर्चात आमदार ऋतुराज पाटील,शिवसेनेचे संजय पवार,विजय देवणे, आरपीआयचे नेते सहभागी झाले.
ही गरीबांची घरे आहेत. गायरान कोणत्याही परिस्थितीत काढू देणार नाही. याबाबत पुर्नविचार झाला पाहिजे. राज्यशासनाने सकारत्मक भूमिका घ्यावी अशी मागणी सतेज पाटील यांनी केली. ज्या पध्दतीने शहरात गुंटेवारी किंवा अनधिकृत बांधकामांना अधिकृत करून देतो तसेच या गरीब लोकांना गायरान मधील अतिक्रमण नियमित करून द्यावे या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.अतिक्रमण काढण्याला स्थगिती नाही दिल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असेही सतेज पाटील म्हणाले.
मुंबई उच्च न्यायालयाने 6 ऑक्टोंबर 2022 च्या आदेशानुसार 31 डिसेंबर 2022 पर्यंत ही अतिक्रमणे काढण्याच्या सुचना राज्य शासनाला दिल्या आहेत. याबाबात इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याला स्थगिती द्यावी अशी मागणी आवाडे यांनी याचिकेत केली आहे.दरम्यान आज सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली गायरान अतिक्रमणाला स्थगिती देण्यासाठी कोल्हापुरात सर्वपक्षीय एकवटले आहे.