पथसंचलन कार्यक्रमात पोलीस महानिरीक्षक एस. रवी यांचे आवाहन
प्रतिनिधी /बेळगाव
पोलिसांनी नवी आव्हाने स्वीकारण्यासाठी सज्ज व्हावे. स्वतःला जनसेवेत गुंतविताना तहान, भूक विसरून काम करावे लागते. प्रामाणिकपणे केलेल्या कामाची समाजात कदर होते. भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी पोलिसांनी तयार राहावे, असे आवाहन राज्य राखीव दलाचे पोलीस महानिरीक्षक एस. रवी यांनी केले.
शुक्रवारी सकाळी मार्केटयार्डजवळील पोलीस परेड ग्राऊंडवर राखीव दलाच्या प्रशिक्षण पूर्ण केलेल्या जवानांचे पथसंचलन झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. राखीव दलाचे पोलीस उपमहानिरीक्षक एम. व्ही. रामकृष्ण प्रसाद, पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील, राखीवदल प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य रमेश बोरगांवे, मुनीराबाद प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ. रामकृष्ण मुद्देपाल उपस्थित होते.
राज्य राखीव दलाच्या कंग्राळी खुर्द प्रशिक्षण केंद्रातील आठवी तुकडी व मुनीराबाद (जि. कोप्पळ) प्रशिक्षण केंद्रातील 25 व्या तुकडीचे शनिवारी पथसंचलन झाले. यावेळी राष्ट्रध्वज व पोलीस ध्वजाच्या साक्षीने प्रशिक्षण पूर्ण केलेल्या जवानांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता सेवाकार्य करण्याची शपथ घेतली. या जवानांचे आकर्षक पथसंचलन झाले. बक्षीस वितरणाचाही कार्यक्रम झाला.