बीडमधील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी; बळीराजाला दिला दिलासा
कोल्हापूर प्रतिनिधी
अतिवृष्टीने शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱयांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी स्वराज्य संघटनेचे प्रमुख माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. संभाजीराजे सध्या अतिवृष्टीग्रस्त भागांना भेट देत आहे. गुरूवारी त्यांनी बीड जिल्हय़ातील नुकसानग्रस्त शिवाराला भेट दिली. शेतकऱयांशी संवाद साधून त्यांना दिलासा दिला.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर संभाजीराजे यांनी स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांची भेट घेतली. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. बीड जिह्यात गेल्या 5 दिवसांतमध्ये 8 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यामध्ये महिला शेतकरी व युवा शेतकऱ्यांचाही समावेश आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे, अशा भावना व्यक्त करीत पंचनाम्यामध्ये वेळ न घालता दिवाळीच्या अगोदर विशेष बाब म्हणून सरसकट 100% पीकविमा मंजुर करण्यात येण्यासाठी प्रशासकीय पातळीवर आदेश काढावा, अशी मागणी संभाजीराजे यांनी केली. तसेच या संदर्भात शासकीय पातळीवर मागणी पोहचवावी, असे त्यांनी जिल्हाधिकारी शर्मा यांच्याशी चर्चा करताना सांगितले.
एनडीआरएफ, एसडीआरएफच्या निकषांनुसार अनुदान द्या
एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या निकषांनुसार तातडीने अनुदान द्यावे. प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत मिळणारे 2,000 रुपये केवायसीमुळे रखडले आहेत ते शेतकऱयांना तातडीने देण्यात यावेत, तसेच काही शेतकऱयांना हे 2000 रुपये मिळून देखील बॅंकेने त्यांची खाती होल्ड केलेली आहेत ती अनहोल्ड करावीत, अशी मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी यावेळी केली. यावेळी स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते धनंजय जाधव, गंगाधर काळकुटे, शेतकरी संघटनेच्या पूजा मोरे व शेतकरी बांधव उपस्थित होते.
ऐन दिवाळीच्या तोंडावर अतिवृष्टीने राज्यातील शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱयांना सरकारने तात्काळ मदत करून त्यांची दिवाळी गोड करावी
संभाजीराजे छत्रपती, प्रमुख, स्वराज्य संघटना