हिंदू राष्ट्र अधिवेशनात विविध संघटनांचा निर्धार
प्रतिनिधी /फोंडा
देशपातळीवर राममंदिर, काशी विश्वनाथ, मथुरा, कुतुबमिनार, ताजमहल आणि भोजशालाच नव्हे तर हजारो मंदिरे मुगल व पोर्तुगीजांच्या राजवटीत उद्ध्वस्त करण्यात आली. भारत स्वतंत्र होऊनही ही पवित्र स्थळे हिंदू भाविकांसाठी मुक्त झालेली नाहीत. या मंदिरांच्या पुर्ननिर्माणासाठी देशव्यापी मोहीम उघडण्याचा संकल्प समस्त मंदिर संघटना, भक्त, पुरोहित व हिंदूत्वनिष्ठ संघटनांनी केली आहे. त्यात गोव्यातील अशा प्राचिन मंदिरासंबंधी पुरावे आढळल्यास न्यायालयात लढा उभारण्याचा निर्धार रामनाथी येथे सुरु असलेल्या अखिल भारतीय हिंदू राष्ट्र अधिवेशनात करण्यात आला.
गोमंतकीय जनतेने आपल्या खासगी दप्तरात मंदिरांसंबंधी जुने दस्ताऐवज असल्यास ते हिंदू जनजागृती समितीकडे सुपूर्द करण्याचे आवाहन पत्रकार परिषदेत करण्यात आले.
ज्ञानवापी खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाचे ऍड. विष्णू शंकर जैन, वाराणासी येथील ऍड. मदन मोहन यादव, गोव्यातील भारतमाता की जय संघटनेचे प्रमुख सुभाष वेलिंगकर, गोवा मंदिर महासंघाचे सचिव जयेश थळी व हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता रमेश शिंदे यांनी प्रसार माध्यमांसमोर वार्तालाप केला.
ऍड. जैन म्हणाले, मंदिरांचे पुर्ननिर्माण करण्याच्या मोहिमेत पुढील सुत्रे आमच्या संशोधनाचा केंद्र बिंदू राहील. त्यात विवादीत स्थळांचे पौराणिक महत्त्व, नष्ट केल्याची ऐतिहासिक साक्ष खटल्याचा इतिहास, पुरावे आणि कायदेशीर आधार आदीचा अभ्यास केला जाईल.
संशोधनाअंती मंदिरे पाडली गेल्याचे सिद्ध झाल्यास त्यांच्या जिर्णोद्धारासाठी न्यायालयीन लढा उभारण्यात येईल. सध्या अनेक विवादीत स्थळे पुरातत्व सर्वेक्षण खात्याच्या नियंत्रणाखाली असून सदर खाते अधिनियम 1958 कलम 16 च्या विरुद्ध कृती करीत आहे.
वारसा स्थळांच्या जागेत चर्चचे अतिक्रमण : वेलिंगकर
सुभाष वेलिंगकर म्हणाले, पोर्तुगीजांच्या राजवटीत गोव्यात एक हजाराहून अधिक मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली. त्यातील दोन मंदिरे चर्चच्या आक्रमणापासून वाचली असून त्यापैकी एक वेर्णा येथील वरेण्यपुरी व दुसरे सांकवाळ येथील श्री विजयादुर्गा मंदिर. हे मंदिर राज्य पुरातत्व विभागाच्या अंतर्गत वारसा स्थळ म्हणून घोषित केलेले असतानाही मंदिराची भूमी गिळंकृत करण्याचे षडयंत्र चर्चच्या माध्यमातून सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला.
जयेश थळी यांनीही मंदिर संस्थातर्फे न्यायालयीन लढय़ाला पूर्ण सहकार्य केले जाणार असल्याचे सांगून मंदिरासंबंधी ऐतिहासिक कागदपत्रे असल्यास त्यांच्या प्रती जमा करण्याचे आवाहन केले.