विरोधी आघाडीतील अन्य तीन संचालक चिडीचूप : सर्वसाधारण सभेत खाडे, घाटगे, नरकेंच्या भूमिकेवर लक्ष
धीरज बरगे/कोल्हापूर
‘गोकुळ’ची वार्षिक सर्वसाधारण सभा 29 ऑगस्ट रोजी होत आहे. या सभेच्या ठिकाणावरुन महाडिक-पाटील गटातील वाद पुन्हा उफाळून आला आहे. सत्तांतरानंतर विरोधी आघाडीतील संचालिका शौमिका महाडिक यांचा गोकुळमध्ये एकाकी लढा सुरु आहे. तर बाळासो खाडे, आंबरिष घाटगे आणि चेतन नरके यांनी गेली सव्वा वर्ष ‘मौन सर्वार्थ साधनम्’ अशी भूमिका घेतली आहे. विरोधी आघाडीतील हे तीनही संचालक सत्ताधाऱयांशी एकरुप झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे सभेमध्ये खाडे, घाटगे, नरके व्यासपीठावर बसणार की समोर उभारुन कारभाराबाबत जाब विचारणार याकडे सभासदांचे लक्ष आहे.
जिल्हय़ाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असणाऱया गोकुळमध्ये तब्बल 35 वर्षानंतर सत्तांतर झाले. तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील यांनी काँग्रेसह राष्ट्रवादी, शिवसेना, जनसुराज्य, शेकाप आदी पक्षांच्या नेत्यांची मोट बांधत गोकुळमध्ये एकहाती सत्ता मिळवली. यानंतर गोकुळमध्ये बऱयाच आदलाबदली झाली. यावेळी वाहतूक टेंडर प्रक्रिया, कर्मचाऱयांच्या बदल्या, मुंबईमधील जागा खरेदी, पुणे, मुंबई येथील दूध पॅकिंग, विक्रीचे ठेके यावरुन शौमिका महाडिक यांनी प्रसारमाध्यमांसमोर सत्ताधाऱयांना वळोवेळी जाब विचारला. मात्र यावेळी त्यांना त्यांच्यासोबत असलेल्या अन्य तीन संचालकांचे पाठबळ मिळाले नाही. त्यामुळे महाडिक यांचे प्रश्न हे केवळ प्रश्नच राहिले आहेत.
महाडिक गट विचारणार जाब
गोकुळच्या सभेत प्रथमच महाडिक गट विरोधकांच्या भूमिकेत असणार आहे. एकापाठोपाठ एका पराभवाने खचलेला महाडिक गट धनंजय महाडिक राज्यसभेवर निवडून गेल्यानंतर चार्ज झाला आहे. त्यामुळे सभेमध्ये महाडिक गट पूर्ण ताकदीने उतरण्याच्या तयारीत आहे. अहवाल पुस्तकातील विविध मुद्यांवरुन सत्ताधाऱ्यांना वेठीस धरण्याचाही त्यांचा प्रयत्न राहणार आहे.
महाडिक यांच्यासोबत कोण?
गोकुळच्या रणांगणात तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासोबत असणारे खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर हे सध्या शिंदे-फडणवीस सरकारसोबत आहेत. माजी आमदार चंद्रदीप नरके यांचाही कल शिंदे-फडणवीस सरकारकडेच असल्याची चर्चा आहे. त्यामुळे गोकुळच्या सभेमध्ये महडिक यांच्यासोबत यापैकी कोण येणार, याकडेही लक्ष राहणार आहे.
गोकुळच्या माध्यमातून ‘महाभारत’ला सुरवात
युवाशक्तीच्या दहीहंडी कार्यक्रमातून खासदार धनंजय महाडिक यांनी जिल्हय़ात महाभारत होणार असे म्हणत एकप्रकारे आमदार सतेज पाटील यांना अप्रत्यक्ष इशाराच दिला आहे. जिल्हय़ाच्या राजकारणाचा केंद्रबिंदु असणाऱया गोकुळमध्ये सत्तांतर घडविण्यासाठी महाडिक परिवार प्रयत्नशील राहणार आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारच्या माध्यमातून गोकुळच्या रणांगणावरुन महाभारताला सुरवात होणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.