नवी दिल्ली; कडाक्याच्या उन्हात मान्सूरसरींसंबंधी दिलासादायक आनंदवार्ता समोर आली आहे. युरोपियन सेंटर फॉर मिडियम रेंज वेदर फोरकास्टनुसार (ईसीएमडब्ल्यूएफ) नुसार, चालूवर्षी मान्सून १० दिवस अगोदर देशात दाखल होऊ शकतो. या अंदाजानुसार सर्वसाधारणपणे मान्सून केरळच्या किनारपट्टीवर २१ मे रोजीच धडकू शकतो. दरवर्षी केरळमध्ये साधारणपणे जूनच्या पहिल्या आठवडय़ात मान्सून दाखल होतो. त्यानंतर देशाच्या इतर भागात पोहोचतो. बंगालच्या उपसागरात नुकतेच झालेले हवामान बदल आणि अरबी समुद्रात अँटिसायक्लोन क्षेत्र तयार होत असल्यामुळे मान्सून केरळमध्ये लवकरच पोहोचू शकतो. त्याच्या प्रभावाखाली पश्चिम विभागाच्या इतर भागातही पाऊस पडू शकतो, असा अंदाज ‘ईसीएमडब्ल्यूएफ’ने व्यक्त केला आहे.
भारतीय हवामान विभागानेही यापूर्वीच सॅटेलाईट ईमेजमधून समोर आलेल्या माहितीचा आधार घेत मान्सून वेळेवर येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्याचबरोबर स्कायमेट वेदर सर्व्हिसेसचे महेश पलावत यांनीही मान्सून अपेक्षित वेळेच्या आसपास सुरू होईल असे म्हटले आहे.
दरम्यान, बंगालच्या उपसागरात झालेल्या हवामान बदलानुसार सध्या अरबी समुद्रात अँटी-सायक्लोन क्षेत्र तयार होत असल्याचे संकेत मिळतात. त्यामुळे मान्सून केरळमध्ये लवकर पोहचणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
देशही लवकरच व्यापणार
दरवर्षी मान्सून 20 ते 21 मेच्या दरम्यान अंदमान-निकोबार बेटांवर दाखल होतो. त्यानंतर 1 जूनला तो केरळच्या किनारपट्टीवर धडकतो. यानंतर खऱया अर्थाने त्याचा देशातील प्रवास सुरू होतो. यातील एक शाखा पश्चिम, तर दुसरी शाखा पूर्वेच्या दिशेने प्रवास करीत संपूर्ण देश व्यापते. मान्सूनच्या उशिराच्या आगमनामुळे त्याचा देशातील प्रवासही लांबतो. मात्र, यंदा मोसमी पावसाचे लवकर आगमन होणार असल्याने त्याचा प्रवास लवकर पूर्ण होऊन तो देशही वेळापत्रकाआधीच व्यापण्याची शक्यता आहे.
शेती-भातीची भिस्त मान्सूनवर अवलंबून
मान्सून 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होतो आणि जुलैच्या मध्यापर्यंत देशभर पसरतो. त्यामुळे देशातील एकूण पावसापैकी 70 टक्के पाऊस नैर्त्रुत्य मान्सूनमधून पडतो. भारतातील निम्मी रब्बी पिके या मान्सूनवर अवलंबून आहेत. देशात 40 टक्के शेतकरी सिंचनासाठी मान्सूनवर अवलंबून आहेत. भात, कापूस, ऊस, मसूर, हरभरा, मोहरी ही खरीप पिके घेणारे शेतकरी या पावसाळय़ावर अवलंबून आहेत.
बंगालमध्ये असानी चक्रीवादळ
बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाबाच्या क्षेत्र निर्माण झाले आहे. शनिवारपर्यंत त्याची तीव्रता वाढण्याची चिन्हे आहेत. त्यानंतर 8 मेच्या सायंकाळपर्यंत पूर्वमध्य बंगालच्या उपसागरात त्याचे वादळात रुपांतर होईल. या वादळाचा प्रवास उत्तर-उत्तरपश्चिमेकडे असा होणार असून, 10 मे रोजी आंध्र व ओरिसा किनारपट्टीदरम्यान ते धडकण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या संभाव्य चक्रीवादळाचे असानी असे नामकरण करण्यात आले आहे. श्रीलंकेकडून हे नाव देण्यात आले आहे.