पुणे / प्रतिनिधी :
राज्य सरकारने गड किल्ल्यांचे संवर्धन केले पाहिजे. त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला पाहिजे. ज्या प्रकारे रायगड किल्याचे संवर्धन सुरू आहे, त्याच धर्तीवर किल्ल्यांचे संवर्धन व्हायला हवे. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्तेमध्ये आला आहात. त्यामुळे राज्यातील गडकिल्ले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या प्रश्नाकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष द्यायला हवे, अशी मागणी संभाजीराजे यांनी येथे केली.
पुण्यात बोलताना संभाजीराजे यांनी ही भूमिका मांडली ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या जलपूजन कार्यक्रमास गेलो होतो. पण आता त्यावर कोणीही बोलण्यास तयार नाही. तसेच आता राज्य सरकारने त्यांच्या हातात ज्या काही गोष्टी आहेत, किमान त्या तरी करण्याची गरज आहे. राज्यात समुद्राच्या किनाऱयावर सर्वाधिक किल्ले आहेत. त्याबाबतचा प्लॅन माझ्याकडे आहे. त्यावर मी बोलून थकलो असून त्याची कोणीही दखल घेत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले, याबद्दल मला माहिती नाही. मी किल्ल्यावर असल्याने मला दुसरे काही सुचत नव्हते. रायगड किल्ल्याचे संवर्धन कसे करता येईल, त्यामध्ये मी मग्न होतो, असेही त्यांनी नमूद केले.
मागील महिन्याभरापासून छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर की स्वराज्य रक्षक यावरून सध्या वाद सुरू आहे. त्याबाबत संभाजी राजे यांना विचारले असता ते म्हणाले, की आता आपण त्याच्यापलीकडे जाण्याची गरज आहे. या काही जुन्या पदव्या नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या ओरिजिनल उपाध्या वेगळय़ा आहेत. 100 ते 200 वर्षांत आमच्यासारख्या लोकांकडून दिलेल्या उपाध्या आहेत. तर छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यवीर, स्वातंत्र्यवीर आणि धर्मवीर असल्याचे आजवर मी केलेल्या ऐतिहासिक भाषणात सांगत आलो आहे. त्यावेळी कोणाला लक्षात आले नाही. पण आता धर्मवीर शब्दावरून वेगवेगळे राजकीय पक्ष राजकारण करीत आहेत, असे मतही त्यांनी मांडले.