प्रतिनिधी/ सातारा
अवकाळी पाऊस अन् सोसाटय़ाच्या वाऱयाच्या परिणामाने पोवई नाका येथील जिल्हा पुरवठा विभागाच्या धान्य गोदामाच्या छताचे पत्रेच शुक्रवारी उडाले होते. अन् येथील कर्मचाऱयांची चांगलीच दाणादाण उडाली. पत्रे उडाले अन् आता पाऊस येण्याची चाहुल लागताच येथील कर्मचाऱयांनी येथे असणाऱया धान्यांच्या साठय़ावर त्वरीत ताडपत्रे घातली. पाऊस थांबताच पीडब्लुडीच्या कर्मचाऱयांनी येथे झालेल्या नुकासाना बाबतची त्वरीत माहिती घेतली, आणि गोदाम दुरूस्तीच्या कामकाजास युध्दपातळीवर सुरूवात करण्यात आली.
शनिवारी सायंकाळ पर्यंत येथील गोदामाच्या दुस्तीचे काम कर्मचाऱयांच्यावतीने करण्यात येत होते. पोवई नाका येथे सातारा-लोणंद मार्गावर सुमारे 500 मेट्रीक टन धान्य साठवण क्षमता असलेली 3 गोदामे आहेत. गोलाकारकृती असणाऱया येथील एका गोदामाचे पत्रेच वाऱयाने उडाल्याने गोदामाच्या एक बाजु संपुर्ण पणे उघडी झाली होती. पण कर्मचाऱयांच्या सतर्कतेमुळे येथे कोणत्याच प्रकारे धान्याचे नुकसान झाले नाही. तसेच काही धान्य साठा हा इतरत्र गोदामामध्ये हलविण्यात आला. याप्रसंगी जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी राजेश जाधव, तहसीलदार रणजित देसाई, महसूल नायब तहसीलदार दयानंद कोळेकर व पुरवठा निरिक्षक संतोष दळवी उपस्थित होते.