सतेज पाटील-विनय कोरे ठरले किंगमेकर
पी.एन. पाटील, यड्रावकर-मुश्रीफांनी गड राखला
भाजपची जोरदार एंट्री महाविकासची डोकेदुखी वाढवणारी
कोल्हापूर / संतोष पाटील
ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांनी शहर दक्षिण आणि गगनबावडय़ात तर आमदार विनय कोरे यांनी पन्हाळा, हातकणंगले आणि शाहूवाडीत आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. माजी मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना ग्रामपंचातीचा निकाल दिलासादायक ठरला. कागल तालुक्यातील राजकीय त्रांगडे कायम ठेवण्याचे संकेत मतदारांनी दिले. मागील अडीच वर्षात बॅकफुट गेलेल्या भाजपची जोरदार एंट्री महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढवणारी आहे. आमदार पी. एन. पाटील यांनी आपल्या स्टाईलने करवीरमध्ये बहुमत मिळवले. आमदार प्रकाश आबिटकर यांना गड राखताना स्वकीयांसह राष्ट्रवादीचा तगडा सामना करावा लागणार आहे. चंद्रदीप नरके यांनी राजकीय भूमिका जाहीर करण्याची गरज निकालाने दाखवून दिली. आमदार राजू आवळे आणि डॉ. सुजित मिणचेकर यांच्यापुढील जनसुराज्य-भाजपचे तगडे आव्हान स्पष्ट झाले. ग्रामपंचायत निवडणुकीतून जनमानसाचा कानोसा घेतल्यास बलस्थाने आणि कुमकुवत बाजू शोधण्यास नेत्यांना सोपे जाणार असल्याने ही निवडणूक विधानसभेची लिटसमटेस्ट ठरणार आहे.
करवीर विधानसभा मतदार संघात 32 पैकी 13 ठिकाणी काँग्रेसने पर्यायाने आमदार पी.एन. पाटील यांनी बाजी मारली. वडणगेसह करवीरच्या उत्तर गावातील मतदारांनी नरके यांची साथ कायम ठेवली. चिखलीसारख्या मोठय़ा आणि महत्वाच्या गावात काँग्रेसच्या साथीने महाडिक गटाने गुलाल उधळला. चंद्रदीप नरके यांनी जाहीर राजकीय भूमीका घेण्याची वेळ आल्याचे संकेत मतदारांनी यानिमित्ताने दिले. मतदार संघातील सतेज पाटील आणि महाडिक गट यांचा राजकीय वावर निकालाने अधोरेखित झाला. दक्षिणेत सतेज पाटील आणि ऋतुराज पाटील यांनी 18 ग्रामपंचायतीमध्ये गटाने विजयाचा गुलाल उधळला. गांधीनगर हे मोठय़ा लोकसंख्येच्या गावात महाडिक गटाने आपला टच कायम राखल्याचे निकालातून दिसले. पाटील आणि महाडिक गटातील टशन येत्या काळात अजून टोकदार होण्याची शक्यता आहे. गगनबावडा तालुक्मयातील 18 ग्रामपंचायतीवर आपल्या गटाचा सरपंच करुन सतेज पाटील यांनी वर्चस्व दाखवून दिले. गगनबावडा या हक्काच्या बालेकिल्यातून जिल्हा बँकेचे राजकारण करणाऱया सतेज पाटील यांनी करवीर आणि पन्हाळा-शाहुवाडी मतदार संघात चेकमेट देण्याइतपत पकड मजबूत केल्याचे दाखवून दिले.
शाहूवाडी तालुक्यात उद्धव ठाकरे शिवसेना स्वतंत्र आणि राष्ट्रवादीसोबत युती करुन एकूण 25 गावात गुलाल उधळला. जनसुराज्य 11 जागेवर अस्तित्व राखले. पन्हाळय़ात 40 पैकी 19 जागांवर जनसुराज्य पक्षाने गुलाल उधळला. नरके गटाने 16 तर स्थानिक आघाडय़ांनी 11 जागांवर गुलाला उधळला. विनय कोरे आणि सत्यजित पाटील या पारंपरिक प्रतिस्पर्धीमध्येच विधानसभेची लढत होणार असून पन्हाळय़ाचा गड राखाताना विनय कोरे यांनी शाहूवाडीतील पकड कायम ठेवली आहे. शाहूवाडीत पाटील गटाने आपले अस्तित्व अधिक ठळक केल्याचे निकालातून दाखवून दिले. हातकणंगलेचा निकाल काँग्रेससह ठाकरे शिवसेनेची चिंता वाढवणारा आहे. होमपिच असलेल्या शिरोलीसह सहा ठिकाणी महाडिक गट विजयी झाला. विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षाने 11 गावात आपले कारभारी निश्चित केले. आवाडे गट आणि स्थानिक आघाड्या तीन ठिकाणी, स्वाभिमानी शेतकरी संघटना दोन आणि बाळासाहेबांची शिवसेना तीन तर काँग्रेस, मनसे आणि राष्ट्रवादी प्रत्येक एका जागेवर समाधान मानावे लागले. जनसुराज्य पक्षाने मतदारसंघात पुन्हा आपली पकड मजूबत केल्याचे स्पष्ट झाले. भाजपच्या साथीने जनसुराज्य पक्ष विधानसभा निवडणुकीत प्रस्थापितांना धक्का देण्याच्या तयारीत आहे.
राधानगरी-भुदरगड आणि आजरा मतदार संघातील सरमिसळ प्रकाश आबिटकर यांची डोकेदुखी वाढवणारी आहे. गटा-तटाच्या राजकारणाने आबिटकर आणि राष्ट्रवादी या दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्ध्याना समान अंतरावर ठेवल्याचे चित्र आहे. चंदगड तालुक्मयात 22 हुन गावातील सत्तांतर, काँग्रेसने तयार केलेला दबाव, भाजपची कायम असलेली ताकद, 22 हून अधिक गावात झालेले सत्तांतर प्रस्थापितांना राजकीय भूमिका तपासण्यास भाग पाडणारे आहे. शिरोळ तालुक्मयातील 17 पैकी 11 गावातील विजयाचा दावा माजी मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना दिलासा देणारा आहे. विधानसभेला शिवसेना की काँग्रेस हा महाविकास आघाडीचा पेच सोडवावा लागेल. पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी अनेक गावात एकाच व्यासपीठावर आल्याने झालेली राजकीय सरमिसळ विधानसभेचं गणित चुकवू शकते. कागल तालुक्यातील गटातटाचे राजकारण कायम राहिले. हसन मुश्रीफ यांची सरशी झाल्याचे चित्र असले तरी प्रत्येकी सहा जागांवर विजय मिळवणारी दुफंगलेली शिवसेना कोणाला मारक ठरणार हे विधानसभा निवडणूक स्पष्ट होईल. भाजपने मतदार संघात दहा ठिकाणी मिळवलेला विजय राष्ट्रवादीला आत्मचिंतन करायला लावणार आहे. गटांची विभागणी अणि एकीवरच विधानसभेची गणित अवलंबून आहेत. गडहिंग्लज, चंदगड आणि आजरा तालुक्यातील सत्तांतर प्रस्थपितांना राजकीय दिशादर्शन करणारे आहे.
2021 च्या ग्रामपंचायत निवडणुकीत काय होती स्थिती
भुदरगड तालुक्यात प्रकाश आबिटकर यांनी जोरदार यश मिळवत अनेक गावात नव्याने सत्ता मिळवली. दक्षिणेत पालकमंत्री सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली 12 पैकी 11 ग्रामपंचायती ताब्यात ठेवल्या. पन्हाळय़ात जनसुराज्य तर शाहूवाडीत शिवसेनेने बालेकिल्ले राखले. करवीर तालुक्यात शिवसेना बॅकफुट गेली. कागल तालुक्यात मंडलिक मुश्रीफ गट युतीला सहा, संजय घाटगे-मुश्रीफ गट युती पाच तर मंडलिक-राजे गटाने तीन तर राजे संजय घाटगे गटाने एका ठिकाणी सत्ता मिळाली. हातकणंगले तालुक्यात 21 ग्रामपंचातीच्या निवडणुकीत महाविकास आघाडी सात, शिवसेना आणि जनसुराज्य प्रत्येकी तीन, सर्वपक्षीय तीन आणि आवाडे समर्थक ताराराणी आघाडीने तीन ठिकाणी विजय मिळवला होता. शिरोळ तालुक्यात महाविकास आघाडीने एकीचे बळ दाखवले. स्वाभिमानी आघाडीने पाच ठिकाणी यश मिळवले. शाहूवाडी तालुक्यात 13 ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला. जनसुराज्यने आठ ग्रामपंचायती ताब्यात ठेवल्या. गगनबावडा तालुक्यातील आठ पैकी सहा ठिकाणी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आघाडीने बाजी मारली. शहर दक्षिण विधानसभा मतदार संघात 12 पैकी 11 ठिकाणी काँग्रेसगटाची सत्ता आली होती. करवीर तालुक्यात बहुतांश ठिकाणी शिवसेनेला सत्ता गमवावी लागली होती. तर भाजपने तीन ठिकाणी विजय मिळवत अस्तित्व राखले. राधानगरी तालुक्यात 17 पैकी सात ठिकाणी राष्ट्रवादी तर नऊ ठिकाणी सर्वपक्षीय स्थानिक आघाड्यांची सरशी झाली. पन्हाळा तालुक्यात जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे यांचे वर्चस्व कायम राहिले होते. 39 पैकी 25 ग्रामपंचायतीत जनसुराज्यने सत्ता राखली. गडहिंग्लज आणि आजरा तालुक्यात स्थानिक आघाडय़ाच ताकदवान ठरल्या.