नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारताचे विदेश व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांच्या दोन दिवसांच्या रशिया दौऱयाला सोमवारी प्रारंभ झाला आहे. प्रदीर्घ काळ चाललेल्या आणि जगाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा दुष्परिणाम घडविणाऱया रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर हा दौरा होत असल्याने त्याचे महत्व आंतरराष्ट्रीय पातळीवर अधोरेखित झाले आहे.
भारत हा पश्चिम आणि पूर्व यांचा समान मित्र समजला जातो. त्यामुळे हे युद्धा थांबविण्यासाठी भारताने महत्वाची भूमिका साकारावी अशी अपेक्षा जगभरातील राजकीय तज्ञांकडून व्यक्ती केली जात आहे. जयशंकर हे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना समजावण्यात यशस्वी ठरले आणि त्यामुळे हे युद्ध थांबले किंवा निदान त्याची तीव्रता कमी झाली, तरी ते मोठे यश मानले जाईल. जयशंकर यांची रशियाचे विदेश मंत्री लाव्हरोव्ह यांच्याशी चर्चा होणार असून त्यानंतरच या भेटीचे फलित निर्धारित होईल. काही तज्ञांच्या मते पुतिन यांच्याकडून युद्ध थांबविले जाईल अशी अपेक्षा करणे व्यर्थ आहे. कारण हा पुतीन यांनी प्रतिष्ठेचा मुद्दा बनविला आहे. परिणामी, जयशंकर पुतीन यांच्यासमोर नेमके कोणते म्हणणे मांडतील आणि पुतीन त्याला कसा प्रतिसाद देतील यावरच पुढील घडामोडी अवलंबून असतील. मंगळवारी या दौऱयाचा महत्वाचा भाग साकारणार असून त्यानंतरच दौऱयाच्या फलिताविषयी भाष्य करता येईल, असेही बोलले जाते.
बालीची जी-20 परिषद
येत्या काही दिवसांमध्येच इंडोनेशियातील बाली येथे जी-20 परिषद होत आहे. त्याआधी होणाऱया दौऱयाला त्या दृष्टीनेही महत्व आहे. 15 आणि 16 नोव्हेंबर या कालावधीत बाली येथे ही परिषद होत आहे. या परिषदेत जे मुद्दे चर्चिले जातील, त्यांच्यात रशिया-युपेन युद्धाचा मुद्दा प्रमुख असण्याची शक्यता आहे.