वनमंत्री उमेश कत्ती यांच्या हस्ते फलकाचे अनावरण : मान्यवरांची उपस्थिती
प्रतिनिधी /खानापूर
करंबळ येथे तयार करण्यात आलेल्या ट्री-पार्कच्या उद्घाटनाचा मुहूर्त सोमवारी सापडला. वनमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. त्यानंतर आलेल्या पावसात कार्यक्रम आटोपता घ्यावा लागला.
करंबळ येथे वनखात्याच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ट्री-पार्कचे उद्घाटन दोन वर्षे रेंगाळले होते. सोमवार दि. 20 जून रोजी उद्घाटन निश्चित करण्यात आले. त्या दृष्टीने वनमंत्र्यांसह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार होता. वनमंत्री उमेश कत्ती यावेळी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते फलकाचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर मंत्री उमेश कत्ती, आमदार अंजली निंबाळकर, केएफडीसीचे सदस्य सुरेश देसाई यांच्या हस्ते ट्री-पार्कचे उद्घाटन करण्यात आले.
मंत्री उमेश कत्ती यांनी पावसातच संपूर्ण पार्कची पाहणी करून समाधान व्यक्त केले. वनखात्याच्या वतीने उमेश कत्ती व आमदार निंबाळकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सीसीएफ मंजुनाथ चव्हाण, डीएफओ हर्षा बानू, एस. एस. निंगाणी, बसवराज वाळद, खानापूर आरएफओ कविता इरन्नावर, लोंढा आरएफओ गौरद यांच्यासह वनखात्याचे अधिकारी उपस्थित होते.
कोचेरी यांच्या तक्रारीची वनमंत्र्यांकडून दखल
बाळेवाडी मठातील वीजपुरवठय़ाचे काम वनखात्याकडून रोखण्यात आले होते. त्याबाबत वनमंत्री उमेश कत्ती यांच्याकडे प्रमोद कोचेरी यांनी तक्रार केली असता त्यांनी सीसीएफ व डीएफओ यांना बाळेवाडी मठातील वीजपुरवठय़ाचे काम करण्यास अनुमती देण्याची सूचना केली. ते काम पूर्ण झाल्यानंतर अहवाल मला पाठवून द्या, असे सांगितले.
तालुक्यातील समस्यांबाबत पुढील आठवडय़ात बैठक घेऊन तोडगा काढू
वनमंत्री उमेश कत्ती यांचे पत्रकार परिषदेत प्रतिपादन
तालुक्यातील दुर्गम भागातील रस्ते वनखात्याने अडवले आहेत. त्याबाबत आपण वरिष्ठ अधिकाऱयांसोबत पुढील आठवडय़ात खानापुरात बैठक घेऊन निश्चित यावर कायमस्वरुपी तोडगा काढू, असे मत वनमंत्री उमेश कत्ती यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
करंबळ येथील ट्री पार्कच्या उद्घाटनासाठी वनमंत्री उमेश कत्ती सोमवारी खानापूर येथे आले होते. त्यांनी येथील विश्रामगृहात पत्रकारांशी वार्तालाप केला. यावेळी तालुक्यातील रस्ते, पूल, वीजपुरवठा याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, 1980 पूर्वीच्या अस्तित्वात असलेल्या सर्व गावांना रस्ते, वीज, पाणीपुरवठय़ात व्यत्यय आणला जाणार नाही. खानापूर तालुक्याची सर्व माहिती मला आहे. मी दुर्गम भागातील समस्येबाबत जाणून आहे. याबाबत मी वरिष्ठ अधिकाऱयांशी चर्चा केली आहे. पुढील आठवडय़ात प्रत्यक्ष खानापुरात येऊन सर्व खात्याच्या अधिकाऱयांची बैठक घेऊन खोळंबलेली विकासकामे सुरू करण्याच्या दृष्टीने तोडगा निश्चित काढू, एफसीबाबत केंद्रपातळीवर चर्चा करून त्यातील अडथळे दूर कसे करता येतील, याबाबत आपण प्रयत्न करू, असे मंत्री कत्ती यांनी सांगितले.
अग्निपथबाबत मांडली भूमिका
अग्निपथ सैनिक भरतीबाबत काँग्रेसची नकारात्मक भूमिका असल्याने राज्य पातळीवरील काँग्रेस नेते सिद्धरामय्या, डी. के. शिवकुमार यांच्यासह सर्वच काँग्रेस नेत्यांनी विरोधाची भूमिका अवलंबली आहे. अग्निपथबाबत समाजात गैरसमज पसरुन वातावरण बिघडवण्याचे काम काँग्रेस करत आहे. तरी युवकांनी व नागरिकांनी याला बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी तालुका भाजपाध्यक्ष संजय कुबल, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, सोनाली सरनोबत, केएफडीसीचे सदस्य सुरेश देसाई, राजू रायका, किरण यळळूरकर, बाबुराव देसाई यांच्यासह भाजपचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.