पुणे / प्रतिनिधी :
कृष्णेतील दूषित पाण्याने मासे मृत्यूमुखी पडल्याच्या प्रकरणाची येत्या शुक्रवारी न्यायमूर्ती डी. के. सिंग व डॉ. विजय कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू होणार असल्याची माहिती ऍड. गौतम कुलकर्णी यांनी येथे दिली. राजू शेट्टी यांच्यासह प्रकाशतात्या बालवडकर, अनिल बाळू मादनाईक, विश्वास बालीघाटे, शैलेश प्रकाश चौगुले, बाळगोंडा म्हदगोंडा पाटील हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व स्वतः शेतकरीही यात याचिकाकर्ते आहेत.
या प्रकरणात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ऍड. असीम सरोदे यांच्या मदतीने सोमवारी 13 मार्च 2023 रोजी दाखल केलेल्या पर्यावरणहित याचिकेत साखर कारखाना, सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना प्रतिवादी करण्यात आलेले आहे. शेतकऱयांच्या हक्कांसाठी व पर्यावरण रक्षणासाठी केलेल्या याचिकेत ऍड. असीम सरोदे यांच्यासह ऍड. गौतम रमाकांत कुलकर्णी, ऍड. सुघांशी रोपिया इत्यादी न्यायालयीन काम बघत आहेत.
कृष्णा नदीमधे मार्च महिन्याच्या सुरुवातीला सांगली येथील दत्त इंडिया साखर कारखान्याने विषारी रसायन मिश्रित मळी सोडल्यामुळे लाखो मासे तडफडून मृत्युमुखी पडले होते. तसेच सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकासुद्धा कृष्णा नदीमधे विना प्रक्रिया सांडपाणी सोडत असल्यामुळे लाखो मासे, नदीतील इतर जलचर, नदीवर अवलंबून असलेले प्राणी-पक्षी तसेच माणसांचे जीवन धोक्मयात येत आहे. तरी हा सर्व भोंगळ कारभार सुरू असूनही प्रदूषण नियंत्रण मंडळ नुसते कारणे दाखवा नोटीस बजावून काहीच कारवाई करत नसल्याने राजू शेट्टी यांनी ऍड. असीम सरोदे यांच्यामार्फत राष्ट्रीय हरित न्यायाधीकारणात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत दत्त इंडिया साखर कारखाना, प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेला प्रतिवादी करण्यात आलेले आहे. सदर प्रकरणाची सुनावणी लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करून प्रतिवादींच्या बेजबाबदारपणामुळे झालेल्या त्रासाचा हिशोब होईल, असे ऍड. असीम सरोदे यांनी सांगितले.