मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब : पाचही गॅरंटी योजना जारी करणार : सिद्धरामय्यांची घोषणा
प्रतिनिधी/ बेंगळूर
निवडणूक जाहीरनाम्यात घोषणा केलेल्या पाच गॅरंटी योजना जारी करण्याची घोषणा काँग्रेस सरकारने केली आहे. या योजनांसाठी मुहूर्तही निश्चित करण्यात आला असून त्यांची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले आहे. सर्वांना 200 युनिटपर्यंत मोफत वीज, विद्यार्थिनींसह सर्व महिलांना कर्नाटक परिवहनच्या सामान्य आणि एक्स्प्रेस बसमधून मोफत प्रवास, दारिद्र्या रेषेखालील (बीपीएल) कुटुंबातील प्रत्येक सदस्याला 10 किलो तांदूळ, प्रत्येक कुटुंबातील मुख्य गृहिणीला दरमहा 2000 रुपये, बेरोजगार पदवीधर, डिप्लोमाधारकांना भत्ता देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे संपूर्ण देशातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पाचही गॅरंटी योजना लागू करण्यासाठी लाभार्थींना जात, धर्म, भाषा व इतर कोणताही भेद करण्यात आलेला नाही. सर्वांसाठी या योजना जारी केल्या जात आहेत, असे सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे. शुक्रवारी विधानसौधमध्ये मंत्रिमंडळाची विशेष बैठक झाली. या बैठकीतील चर्चेनंतर पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी गॅरंटी योजनांच्या अंमलबजावणीबाबत माहिती दिली. सर्वप्रथम ‘शक्ती’ योजना जारी केली जात आहे. शक्ती योजनेंतर्गत 11 जूनपासून एसी, नॉन एसी स्लिपर, ऐरावत यासारख्या बसेस वगळता सामान्य बसेसमधून राज्यभरात सर्व महिलांना मोफत प्रवास करता येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
जुलै महिन्यापासून ‘गृहज्योती’ योजना जारी केली जाईल. मागील 12 महिने वापरलेल्या सरासरी विजेसह 10 टक्के अधिक वीज मोफत दिली जाईल. दरमहा सरासरी 200 युनिटपेक्षा अधिक विजेचा वापर झाल्यास गृहज्योती योजनेचा लाभ मिळणार नाही. एका कुटुंबाने सरासरी 50 युनिट वीज वापरली तर 10 टक्के अधिक म्हणजेच 55 युनिटपर्यंत मोफत वीज वापरता येईल. भाडोत्री घरांना स्वतंत्र मिटर असेल तरीही योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबतचा अधिकृत आदेश जारी झाल्यानंतरच स्पष्ट माहिती मिळेल.
गृहलक्ष्मी योजना प्रत्येक घरातील एका मुख्य गृहिणीसाठी लागू केली जात आहे. या योजनेसाठी नवे सॉफ्टवेअर विकसित करावे लागणार आहे. त्यासाठी 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी ही योजना जारी करणार असल्याचे सरकारने सांगितले आहे. एपीएल, बीपीएल अशी कोणतीही अट नसल्याचे सरकारने म्हटले आहे. कुटुंबातील सदस्यच एका गृहिणीची निवड करतील. बँक खात्याला आधार कार्ड लिंक असणे गरजेचे आहे. 15 जूनपासून 15 जुलैपर्यंत अर्ज दाखल करण्यासाठी वेळ देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली आहे.
पुरुषांची गैरसोय होऊ नये म्हणून…
11 जूनपासून राज्यातील सर्व महिला, विद्यार्थिनींना राज्य परिवहन महामंडळाच्या सामान्य बसेसमधून विनातिकीट प्रवास करता येणार आहे. मात्र, बसमधील आसनक्षमतेच्या 50 टक्के जागा पुरुषांसाठी राखीव असतील. मोफत प्रवास योजनेमुळे पुरुषांची गैरसोय होऊ नये, याकरिता राखीव जागेसंबंधी अट घालण्यात आली आहे.
ओळखपत्राची होऊ शकते सक्ती
राज्य सरकारने महिलांना मोफत बसप्रवासाठी सध्या कोणत्याही अटी घातलेल्या नाहीत. मात्र, प्रवासाकरिता ओळखपत्र, पास देणार का, याबाबत अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. ओळखीसाठी रेशनकार्ड, आधारकार्ड किंवा मतदार ओळखपत्र यापैकी कोणतेही ओखपत्र दाखविणे बंधनकारक केले जाऊ शकते.
अन्नभाग्य योजनेंतर्गत बीपीएल कुटुंबांना सध्या प्रतिव्यक्ती 6 किलो तांदूळ दिले जात आहे. आता 1 जुलैपासून बीपीएल कार्डधारकांना 10 किलो तांदूळ दिले जाईल तर अंत्योदय रेशनकार्ड असणाऱ्या कुटुंबांनाही माणसी 10 किलो तांदूळ दिले जाईल. यापूर्वी हे कार्ड असणाऱ्या कुटुंबात कितीही व्यक्ती असले तरी 35 किलो तांदूळ दिले जात होते.
अधिकाऱ्यांकडून पाच प्रमुख सल्ले…
गेल्या काही दिवसांपासून सिद्धरामय्या यांनी अधिकारी, अर्थतज्ञ आणि मंत्र्यांच्या सातत्याने बैठका घेतल्या आहेत. तीन गॅरंटी योजना त्वरित राबविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना प्रमुख पाच सल्ले दिले आहेत. अर्थसंकल्पाची व्याप्ती वाढवावी, कर्ज घ्यावे, करवसूलीवर अधिक भर द्या, वापर न झालेले अनुदान परत जमा करणे व अनावश्यक खर्चांना फाटा देणे, विदेशप्रवास, निगम-महामंडळांच्या खर्चावर नियंत्रण, बोगस बीपीएल कार्डे रद्द करणे, असे महत्त्वाचे सल्ले अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
मंत्र्यांनी दिलेले सल्ले
कर्ज करून राज्यावरील कर्जात मोठी भर घालू नये. अटी घालून गॅरंटी योजना जारी करूया. टप्प्याटप्प्याने योजनांची अंमलबजावणी करता येईल. विरोधी पक्षांनी आंदोलन करण्याची संधी मिळू नये, याकरिता गॅरंटी योजनांविषयी असणारा गोंधळ दूर करूया. लोकसभा निवडणुकीपर्यंत साध्या अटी घालता येतील, असे मंत्र्यांनी सिद्धरामय्यांना सांगितल्याचे समजते.
‘गृहलक्ष्मी’साठी कोणते निकष…
कुटुंबातील मुख्य गृहिणीला 2000 रुपये दिले जातील. मुख्य गृहिणी कोणे, हे लोकच ठरवतील. म्हणजेच सासूला की सुनेला 2000 रु. द्यावेत, हा निर्णय कुटुंबातील सदस्यच घेतील. चर्चेनंतर सरकारकडे कोण अर्ज सादर करेल, त्यांनाच गृहिणी संबोधले जाईल. बीपीएल, एपीएल दोन्ही प्रकारची कार्डे असणारे या योजनेसाठी पात्र आहेत. वृद्धाप वेतन किंवा विधवा पेन्शन घेणाऱ्या महिलाही या योजनेसाठी पात्र आहेत. आधार कार्डाच्या आधारे बँक खात्यावर रक्कम जमा केली जाईल.
गॅरंटी-1 गृहज्योती
► 1 जुलैपासून सर्वांना कमाल 200 युनिटपर्यंत मोफत वीज
► मागील वर्षात किती वीज वापरली, त्याची सरासरी काढून तितक्या युनिट विजेसह 10 टक्के अधिक वीज मोफत
► महिन्याला सरासरी 150 युनिट वीज वापरली तर 10 टक्के मिळवून 165 युनिट वीज मोफत
► त्यापेक्षा अधिक वापल्यास अतिरिक्त वीजेसाठी बिल द्यावे लागेल.
► जुलैपर्यंतची थकीत वीजबिले ग्राहकांनीच भरली पाहिजे. त्यासाठी वेळ दिला जाईल.
► सरासरी 200 युनिटपेक्षा कमी वीज वापरलेल्यांना लाभ मिळणार
गॅरंटी-2 गृहलक्ष्मी
► 15 ऑगस्टपासून गृहलक्ष्मी योजना लागू, गृहिणीला दरमहा 2000 रु.
► योजनेचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड, बँक पासबूक द्यावे लागेल
► 15 जून ते 15 जुलै या कालावधीत अर्ज सादर करावेत
► 15 जुलै ते 15 ऑगस्टपर्यंत होणार अर्ज छाननी
► बीपीएल/एपीएल रेशनकार्ड असले तरी योजनेचा लाभ
► 18 वर्षांवरील कोणत्याही एका गृहिणीला मिळणार रक्कम
► सामाजिक सुरक्षा योजनेतील पेन्शन घेणाऱ्या महिलांनाही लागू
► सरकारी निवृत्ती पेन्शन घेणाऱ्यांना लाभ नाही
गॅरंटी-3 अन्नभाग्य
► जुलै महिन्यापासून अन्नभाग्य योजनेंतर्गत प्रतिव्यक्ती 10 किलो तांदूळ
► सर्व बीपीएल, अंत्योदय कार्डधारकांना मिळणार लाभ
► जून महिन्यातील रेशनसाठा वितरण झाल्यामूळे जून महिन्यात नाही.
► अंत्योदय कार्डधारकांनाही माणसी 10 किलो तांदूळ
गॅरंटी-4 शक्ती
► 11 जूनपासून शक्ती योजना जारी
► राज्यातील सर्व महिला, विद्यार्थिनींना परिवहनच्या बसेसमधून मोफत प्रवास
► फक्त कर्नाटकात संचार करण्याची मुभा, ठराविक कि. मी. चे बंधन नाही
► विनाथांबा, राजहंस, वातानुकुलित, स्लीपर कोच बससाठी लागू नाही
► केएसआरटीसीच्या बसेसमध्ये पुरुषांना 50 टक्के जागा राखीव
► बेंगळूर परिवहनच्या एसी आणि लक्झरी बसमध्ये मोफत प्रवास सुविधा नाही
► तृतीयपंथीयांना देखील शक्ती योजनेचा लाभ
गॅरंटी-5 विद्यानिधी
► 2022-23 या शैक्षणिक वर्षातील पदवी, डिप्लोमाधारक बेरोजगारांसाठी भत्ता
► योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करून नोंदणी आवश्यक
► पदवीधर बेरोजगारांना दरमहा 3000 रु. तर डिप्लोमा बेरोजगारांना 1500 रु.
► योजनेचा लाभ 24 महिन्यापर्यंतच.
► एखाद्या वेळेस 24 महिन्यांच्या आत नोकरी मिळाल्यास भत्ता बंद.
► अर्ज दाखल करण्यास लवकरच प्रारंभ, सहा महिने मुदत
► अर्ज स्वीकृतीनंतर कमाल 24 महिन्यापर्यंत भत्ता
अधिकृत आदेश आल्यानंतर चित्र स्पष्ट
सिद्धरामय्या यांनी पाच गॅरंटी योजना जारी करणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र, या योजना जारी करण्यात अनेक गोंधळ आहेत. अधिकृत आदेश आल्यानंतर चित्र स्पष्ट होणार आहे. करातून मिळालेला पैसा राज्यातील जनतेसाठी जारी असलेल्या योजनांसाठी खर्च होणार आहे. त्यामुळे गॅरंटी योजनांसाठी मागील योजना स्थगित करणार का?
– बसवराज बोम्माई, माजी मुख्यमंत्री
घोषणांचे स्वागत, मात्र राज्याचे दिवाळे निघू नये
काँग्रेस सरकारने पाच गॅरंटी योजनांबाबत केलेल्या घोषणांचे मी स्वागत करीत आहे. मात्र, कर्नाटकाचे आर्थिक दिवाळे निघू नये. व्हेनेझुएला देशाचे उदाहरण आमच्यासमोर आहे. तेथेही अशाच प्रकारे मोफत देत असताना देशाचे दिवाळे निघाले होते. अशी अवस्था राज्याची होऊ नये. तुमच्यात पैशांची जुळवाजुळव करण्याचे सामर्थ्य आहे. आधी राज्याच्या आर्थिक स्थितीविषयी श्वेतपत्रिका काढावी.
– सी. टी. रवी, भाजपचे राष्ट्रीय मुख्य सचिव
24 महिन्यापर्यंत बेरोजगार भत्ता
युवा निधी योजनेसाठी बेरोजगार पदवीधरांना दरमहा 3 हजार रुपये आणि बेरोजगार डिप्लोमाधारकांना 1500 रुपये भत्ता देण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. लवकरच या योजनेसाठी अर्ज मागविले जातील. 2022-23 या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या बेरोजगार सर्व प्रकारचे पदवीधर, डिप्लोमा पूर्ण झालेल्यांना 24 महिन्यापर्यंत भत्ता मिळणार आहे. 24 स्वीकृत झाल्यानंतर 24 महिन्यांच्या आत पदवीधराला सरकारी किंवा खासगी नोकरी मिळाल्यास भत्ता देणे बंद केले जाईल. राज्यात कितीजण बेरोजगार आहेत, याची माहिती मिळविली जाईल, असे सिद्धरामय्या यांनी सांगितले.