विमानतळ गोव्यासाठी काय घेऊन येईल आणि दाबोळीचे काय घेऊन जाईल, हे येणारा काळच ठरविणार आहे. येणाऱया काळात पेडणेचा ग्रामीण चेहरा बदलणार, हे नक्की मात्र वास्कोची दैना पेडणेच्या वाटय़ाला येणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे. दाबोळी ते चिपी व्हाया मोप हे अंतर केवळ 142 किलोमीटरचे आहे. या अंतरात तीन विमानतळ हे मोठे अप्रुपच आहे. भविष्यात गोव्याच्या दक्षिण सीमेवर कारवारलाही विमानतळ हवा, असेही वाटू शकते. रत्नागिरीचा विमानतळही नागरी उड्डाणासाठी खुला करण्याच्या प्रयत्नात महाराष्ट्र सरकार आहे. विमानतळ म्हणजे विकासाचे अत्त्युच्च शिखर, असे म्हणता येईल मात्र सर्वसामान्य मध्यमवर्गीयांच्याच नव्हे तर गरिबांच्याही खिशाला परवडणारा हवाई प्रवास जेव्हा उपलब्ध होईल, तेव्हाच तो विकास सार्थ ठरेल. केवळ पर्यटनावर अवलंबून राहून विमानतळांचे पिक आले तर ते एक दिवस धोक्याचे ठरू शकते. मोप पुरते बोलायचे झाल्यास मोप विमानतळाच्या निमित्ताने गोव्यात पुन्हा एकदा ऐतिहासिक नोंद होणार आहे.
मुक्तीनंतर गोव्यात अनेक स्थित्यंतरे आली. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रात बदल होत गेले. विकासाकडे आगेकूच केली. गोव्याने इतिहासात नोंद राहावे, असे काही क्षणही अनुभवले. मोप विमानतळाच्या निमित्ताने गोवा पुन्हा ऐतिहासिक नोंद करणार आहे. येणारा 11 डिसेंबर 2022 हा दिवस गोव्यासाठी ऐतिहासिक ठरणार आहे. गोवा मुक्तीच्या अवघ्या काही वर्षांपूर्वीच गोव्याला पोर्तुगीजांनी दाबोळी विमानतळाची भेट दिली होती. ऐतिहासिक कारवाईत विमानतळ भारतीय सैन्याच्या हाती आला, तो कायमचाच. नागरी विमानतळ नागरी राहिला नाही. लष्करी उड्डाण आणि नागरी हवाई उड्डाणासाठी हा विमानतळ तडजोड करीतच राहिला. त्यामुळे जगाच्या नकाशावर आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून झळकणाऱया गोव्याला स्वतंत्र विमानतळाची आवश्यकता भासू लागली होती. ती गरज अखेर पूर्ण झाली आहे. गोव्याच्या विकासात आणखीन एक मैलाचा दगड पार झालेला आहे. विकास कोणताही असो, त्याचे बरे-वाईट परिणाम असतातच. त्यावर समाधानकारक मात कशी करता येईल, याचा विचार सरकारने आणि झळग्रस्तांनी करायला हवा. मोप विमानतळाचे बरे-वाईट परिणाम काय असतील, याचा उलगडा येणाऱया काळातच होईल.
दाबोळी विमानतळाला या हवाई तळाची निश्चितच झळ बसेल. कालांतराने तो ओस पडण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. मोप विमानतळाचा उगम हा दक्षिण गोव्यातील पर्यटन उद्योगाला जबरदस्त झटका देऊ शकतो. सरकारला जर खरोखरच दाबोळी विमानतळ जीवंत ठेवायचा असेल तर आताच त्यांना तशी व्यावसायिक योजना आखावी लागेल. मोप विमानतळ जीएमआर चालविणार आहे. व्यवसायवृध्दीसाठी त्यांचीही धडपड राहील. दाबोळीच्या सुरक्षेसाठी ही कंपनी तडजोड करण्यास तयार होईल का, हाही प्रश्न आहे. दाबोळी की मोप हा प्रवाशांचा प्रश्न असणार नाही. हवाई प्रवासी आपल्याला सोयीचे असेल, अशाच ठिकाणी उतरतील. पर्यटन व्यवसाय कोसळेल या भीतीपोटीच मोप विमानतळाला विरोध झाला होता. त्यातूनच निर्माण झालेल्या अडीअडचणींवर मात करून हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी वीस वर्षांचा कालखंड निघून गेला. हा सुध्दा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.
आता मोप सज्ज झालेलाच आहे. केवळ हवाई उड्डाण बाकी आहे. 11 डिसेंबरला ते सुध्दा होऊन जाईल आणि पुढे पुढे पेडणेचा ग्रामीण चेहराही बदलून जाईल. विमानतळाचा विकास आणि साधनसुविधांच्या विकासात पेडणेतील अनेक गावांचा चेहरामोहरा बदलणार आहे. या शहरीकरणाचे बरे-वाईट परिणाम इतर गावांवरही होतील. मुक्तीच्या साठ वर्षांनंतरही मागासलेपणाचा शिक्का असलेला पेडणे हा गोव्यातील एक तालुका. आतापर्यंत संथ प्रगती करीत आलेला आहे. मोप विमानतळ आता पेडणे तालुक्याची शान ठरेल. पेडणेकरांनी या प्रकल्पासाठी आपल्या पूर्वजांच्या जमिनी दिलेल्या आहेत. स्थानिक पर्यावरणाचाही बळी दिलेला आहे. वाढत्या लोकसंख्येच्या आव्हानालाही स्थानिकांना सामोरे जावे लागेल. भविष्यात पेडणेकरांना काय लाभ होतील, याचीही उत्कंठा आहे. सुप्त भीती आहे ती, पेडणेचे वास्को होण्याची. वास्कोची दैना पेडणेकरांच्या वाटय़ाला येऊ नये यासाठी सरकारने आणि स्थानिकांनी खबरदारी घ्यायला हवी. रेल्वे व विमानतळामुळे पेडणेच्या औद्योगिकीकरणाची दारे उघडी झाली आहेत. उद्योग, व्यापार, नोकऱयांनिमित्त पेडणेकडे नवख्या लोकांचा ओघ अजूनही वाढणार आहे. टॅक्सी व्यवसाय नको त्या लोकांच्या हाती जाण्याची भीती अधिक आहे. भाडेकरू वाढतील. जमिनींचे भाव वधारतील आणि घरे-दारे जमिनी विकत घेणाऱयांची संख्याही वाढेल. कुणाला काय विकायचे, कुणाला भाडय़ाने ठेवायचे आणि कुणाला नाही, याचा निर्णय पूर्ण विचारांती पेडणेकरांना घ्यावा लागेल. वास्कोची अवस्था भयंकर अशीच आहे. पेडणेची दशा वास्कोसारखी झाल्यास ‘गडय़ा आपला गावच बरा’, असे म्हणण्याची वेळ लोकांवर येईल.
मोप विमानतळ, शेजारच्या सिंधुनगरीलाही खुणावतो आहे. या विमानतळामुळे गोव्याला जेवढय़ा संधी आहेत, तेवढय़ाच संधी सिंधुदुर्ग जिल्हय़ालाही आहेत. वेंगुर्ला परूळेच्या चिपी पठारावर महाराष्ट्रातील चौदावे विमानतळ उभारून नारायण राणेंनी आपले स्वप्न साकारले आहे. कोंकणच्या सीमेवर मोपसारखा महाकाय आंतरराष्ट्रीय विमानतळ होणारच होता तर चिपीचा अट्टहास का होता, हे एक कोडेच आहे. दाबोळीबरोबरच या विमानतळाचे भवितव्य काय, असा प्रश्न कुणाला पडल्यास नवल नाही. 150 कि.मी. अंतराच्या आत दोन विमानतळ असू नयेत, हा हवाई उड्डाण मंत्रालयाचा नियम असला तरी दाबोळी ते चिपी व्हाया मोप हे अंतर केवळ 142 किलोमीटरचे आहे.
अनिलकुमार शिंदे