नागरिकांना सावधानतेचा इशारा : पारा 39 डि.से.पर्यंत
पणजी : राज्यातील कमाल तापमान आता दि. 18 फेब्रुवारीपर्यंत वाढलेलेच राहील. मंगळवारी पुन्हा एकदा जनतेला उष्णतेच्या प्रखर लाटेला सामोरे जावे लागले. पणजीतील तापमान 36 डि.से.च्या पुढे होते तर गोव्यातील सर्वाधिक तापमान दाबोळी येथे होते, तेथे पारा चक्क 38.7 डि.से.पर्यंत पोहोचला होता. हवामान खात्याने दुसऱ्यांदा जनतेला सावधानतेचा इशारा दिला आहे. मंगळवारी पारा आणखी वाढला व सोमवारचा रेकॉर्डही मोडून टाकला. 39 डि.से.पर्यंत हा पारा पोहोचला. दि. 18 फेब्रुवारीपर्यंत तापमान हे नियमित वातावरणापेक्षा जास्त राहील, असे कळविले आहे. नियमित गोव्यात 31 ते 32 किंवा फार तर 33 डि.से. पर्यंत वातावरण असते. परंतु सध्या उष्णतेची लाट गोव्यात पसरलेली आहे. हवामानातील वाढत्या बदलामुळे पारा वाढलेला आहे. भर दुपारी दुचाकी स्वारांनाच असे नव्हे तर चारचाकी चालकांना देखील उष्णतेचे चटके सहन करावे लागले. असे वातावरण कदाचित 20 फेब्रुवारीपर्यंत देखील राहू शकते. हवामान खात्याने ही 18 फेब्रुवारीपर्यंतचा अंदाज व्यक्त केलेला आहे. पणजीत पहाटे वातावरणात गारवा होता आणि तापमान 20 डि.से. एवढे खाली आले होते. दिवसा 36 ते 37 डि.से. व पहाटे 20 डि.से. वा त्याखाली असे विचित्र वातावरण असल्यामुळे अनेक नागरिक हे आजारी पडण्याचीच भीती निर्माण झाली आहे.