पुणे / प्रतिनिधी :
मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. यामुळे आता पावसाच्या माऱ्यानंतर उन्हाच्या झळांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.
राज्यात उन्हाचा कडाका वाढण्यास सुरुवात झाली आहे. मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भाच्या अनेक भागांत पाऱ्याने चाळीशी ओलांडली आहे. अकोल्यात गुरुवारी देशातील सर्वाधिक 44.3 अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. पुढील दोन दिवस कमाल तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
उष्णतेची लाट
मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भात 4 जूनपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे कोकण गोव्यासह महाराष्ट्राच्या काही भागात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
अरबी समुद्रात वादळ?
अरबी समुद्रात 5 जूनच्या आसपास हवेची द्रोणीय स्थिती निर्माण होणार असून, याच्या प्रभावामुळे त्याच्या पुढील 48 तासांत कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतर होण्याचा अंदाज आहे. या क्षेत्रााचे पुढे वादळात रुपांतर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे झाल्यास अरबी समुद्रातील हे या वर्षीचे पहिले वादळ ठरेल. याच्या प्रभावामुळे गुजरात, कर्नाटक, केरळ किनारपट्टी तसेच लक्षद्वीप, मालदीवच्या, कॉमेरुन क्षेत्र, अरबी समुद्रात जोरदार वारे वाहणार असल्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
मान्सून पुढे सरकला
शुक्रवारी मान्सून आणखी थोडा पुढे सरकला असून, लक्षद्वीप, संपूर्ण कॉमेरुन क्षेत्र, दक्षिण बंगालच्या उपसागराचा बराचसा भाग, पूर्वमध्य बंगालचा उपसागर, दक्षिण अरबी समुद्राचा आणखी काही भाग त्याने व्यापला आहे.