त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी : वनखाते म्हणते कापणीस आलेल्या पिकाचे नुकसान झाले तरच भरपाई
वार्ताहर /गुंजी
गुंजी परिसरातील शेतकऱ्यांच्या भात पिकाचे गव्यांकडून प्रचंड नुकसान होत असून येथील शेतकरी त्यांच्या सततच्या उपद्रवामुळे हवालदिल झाला आहे. सुऊवातीपासूनच या परिसरात गव्यांकडून भातपिकांचे नुकसान होत आहे. सायंकाळ होताच हे गवे दररोज वेगवेगळ्या भागातील भातपिकात शिरून खाऊन, तुडवून नुकसान करीत असल्याने येथील शेतकऱ्यांच्या पिकाची प्रचंड नासाडी होत आहे. त्यामुळे येथील शेतकरीवर्ग चिंताग्रस्त बनला आहे.
सात-आठ गव्यांचे दोन-तीन कळप या भागात उपद्रव करीत असून दररोज वेगवेगळ्या भागात भातशेतीचे नुकसान होणे नित्याचेच ठरले आहे. काटेरी कुंपण, बॅटरीचा प्रकाशझोत, फटाके, कंदील, शेकोट्या त्याचबरोबर भोंगेही त्यांच्या अटकावासाठी कुचकामी ठरत असल्याने येथील शेतकरीवर्ग पुरता रडकुंडीला आला आहे. सध्या या भागामध्ये भात लागवडीचे काम सुरू असून भात लागवड करण्यासाठी तयार केलेले भात वाफेच गव्यांनी खाऊन फस्त केल्याने भात लागवड करावी तरी कशी, असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. सुऊवातीच्या काळात पावसाने व्यवस्थित साथ दिली नसल्याने काही शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा सामना करावा लागला. तर काही शेतकऱ्यांनी भात लागवडीचा निर्णय घेऊन भात वाफे तयार केले. मात्र भात लागवडीवेळीच तयार केलेले भात वाफेही गव्यांनी खाऊन फस्त केल्याने येथील शेतकऱ्यांसमोर मोठा पेचप्रसंग उद्भवला आहे. त्यामुळे काही शेतकरी परगावाहून लागवडीचे भात आणून भात लागवड करीत आहेत. परंतु लागवड केलेल्या भातपिकाचेही गव्यांकडून अतोनात नुकसान होत आहे.
नुकसानभरपाई नाहीच, शेतकऱ्यातूंन संताप
येथील शेतकऱ्यांना अरण्य खात्यामार्फत नुकसानभरपाई दिली जाते. मात्र सदर नुकसानभरपाई अत्यंत तुटपुंजी आणि वेळीच दिली जात नाही. सध्या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी अरण्य खात्यास नुकसानभरपाईविषयी विचारले असता भात कापणीस आल्यानंतरच नुकसान झाले तर नुकसानभरपाई दिली जाणार. अन्यथा एरव्ही नुकसान झाल्यास त्याचा पंचनामा करता येणार नाही, असे सांगितले जात आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांतून संताप व्यक्त केला जात आहे.
पंचनामा करून भरपाई द्या
सध्या भातपीक राहिले तरच ते नंतर कापणीस येईल. अन्यथा झाडच खाल्ले तर फळं कुठली लागणार, असा सवालही शेतकऱ्यांतून उपस्थित होत आहे. तरी संबंधितांनी याची नोंद घेऊन गव्यांचा बंदोबस्त करावा आणि नुकसानीचा पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.