ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा खंडीत
प्रतिनिधी/ सातारा
संपूर्ण जिल्हय़ालाच मंगळवारी परतीच्या पावसाने चांगलेच झोडपले. सायंकाळच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे शेती पिकांबरोबरच अनेक व्यापारी वर्गांचे ही तितकेच मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. जोरदार पावसासह विजांच्या गडगटांमुळे अनेक ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा ही विस्कळीत झाला होता. जवळ दिडी ते दोन तास पावसाचा जोर हा कायम होता. हवामान खात्याने यापुर्वीच परतीच्या पावसाचे संकेत दिले होते, त्यामुळे पुढील काही दिवस ही असाच पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणच्या सखल भागांमध्ये पाणी तासंतास तुंबून राहिले होते. नुकतेच पालेकेच्यावतीन उत्सवानिमित्त डांबरीकरण करून खड्डे बुजविण्यात आले होते. जोरदार पडलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणचे खड्डे उघडे पडले असून पुन्हा ‘खड्डे जैसे थे’ झाले आहेत. अनेकांनी छत्री, रेणकोट सारखे पावसाळी साहित्य न आणल्याने मिळेल त्या ठिकाणी आसरा घेऊन पाऊस जाण्याची वाट पाहत बसले होते. सध्या हवामानात कमालीचा बदल जाणवत आहे, त्यातच दिवसभर कडक उन्हाचे चटके बसताहेत तर सायंकाळच्या सुमारास विजांसह जोरदार पावसाचे आगमन होत आहे. मंगळवारी ही सायंकाळी अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. दुपारी चारच्या सुमारासच जोरदार पावसाचे आगमन झाले. त्यानंतर पुन्हा सायंकाळी 7 च्या सुमारास मुसळधार पावसाला सुरूवात त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.
गणपती बाप्पांचे देखावे पाहण्याकरीता जाणाऱया नागरिकांची चांगलीच हिरमोड होत आहे. कारण वारंवार पाऊस येत असल्याने अनेकांकडून रात्रीच्या सुमारास बाहेर पडण्याचे टाळण्यात येत आहे. तसेच शाळा व ऑफीसमधून घरी येणाऱयांची ही चांगलीच पळापळी होत आहे. शहरातील अनेक मंडळातर्फे गणेशोत्सवानिमित्त काही सीन उभारले आहेत, काहींनी तर जिवंत देखावे ही सादर करण्यात येत आहेत. पण परतीच्या पावसामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांना ही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार येणाऱया पावसामुळे मंडळाचे कार्यकर्ते ही चांगलेच नाराज होत आहेत. कारण बाप्पांची आरती करण्याकरीता ही पाऊस जाण्याची वाट पहावी लागत आहे.
शेती पिकांचे नुकसान
जोरदार पावसामुळे शेतकऱयांच्या शेती पिकांचे ही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रामुख्याने खरिप कांदा, सोयाबीन, भुईमुग, बाजरी आदी पिकांवर याचा मोठा परिणाम झाला आहे. अनेक शेतामध्ये पाणी जश्यास तसे तुंबून राहिले होते, त्यामुळे पिके कुजण्याची ही शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आजारी पडण्याचे प्रमाण वाढले
सलग दुसऱया दिवशी जिल्हय़ात पावसाचे आगमन झाले, उन्ह पावसाच्या या खेळामुळे मात्र नागरिकांच्या आरोग्यावर ही चांगलाच परिणाम होत आहे. सर्दी, खोकला, ज्वर सारख्या आजाराने त्रस्त झालेल्या नागरिकांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे सरकरी तसेच अनेक खासगी रूग्णालयांमध्ये उपचाराकरीता दाखल होणाऱयांची संख्या ही तितकीच वाढत आहे.