मात्र दिवसभर पावसाने घेतली विश्रांती
प्रतिनिधी /बेळगाव
हवामान खात्याने मान्सूनचे आगमन वेळेत होईल, सरासरी इतका पाऊस पडेल, असे सांगितले. मात्र, यावर्षी मान्सूनचे आगमन वेळेत झालेच नाही. मृग नक्षत्र कोरडेच गेले. त्यानंतर बुधवार दि. 22 रोजी आर्द्रा नक्षत्राला सुरुवात झाली. त्यानंतर हवामानात बदल होऊन गेल्या दोन दिवसांपासून हलक्या सरी कोसळत आहेत. तर काहीवेळा दमदार सरीही कोसळत आहेत. त्यामुळे पिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
शुक्रवारी पहाटेपासूनच पावसाच्या दमदार सरी कोसळल्या. त्यामुळे हवेमध्ये गारवादेखील निर्माण झाला होता. सकाळी 10 नंतर पावसाने पुन्हा विश्रांती घेतली.
दिवसभर बऱयापैकी उघडीपच दिली होती. त्यानंतर सायंकाळी काही भागामध्ये पावसाचा शिडकावा झाला. या पावसामुळे काही भागामध्ये रस्त्यावर पाणी साचून होते. स्मार्ट सिटीच्या कामांचा दर्जादेखील या पावसामुळे उघडा पडला. गोवावेस सर्कल येथे गुडघाभर पाणी साचून होते. सिग्नलजवळच पाणी साचून होते. त्यामुळे ये-जा करणाऱया वाहनांना साचलेल्या पाण्यामध्येच थांबावे लागत होते.
अशाप्रकारे अनेक ठिकाणी रस्त्यावरच पाणी साचल्याचे दिसून येत होते. 5 जुलैपर्यंत आर्द्रा नक्षत्र आहे. याचे वाहन मेंढा असून हा पाऊस तरी शेतकऱयांना तारणार का? याकडे साऱयांचेच लक्ष लागले आहे. भात व इतर पिकांची पेरणी केल्यानंतर पावसाने दडी मारली होती. त्यामुळे साऱयांचेच डोळे आकाशाकडे लागले होते. शुक्रवारी पहाटेच पावसाने दमदार सुरुवात केल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. असे असले तरी अजूनही दमदार पावसाची गरज निर्माण झाली आहे.
या पावसामुळे साऱयांनाच रेनकोट, जॅकेट, छत्री यांचा वापर करावा लागला. पावसामुळे काही प्रमाणात बाजारपेठेतील जनजीवन विस्कळीत झाले होते. सकाळच्या सत्रात भाजी तसेच इतर वस्तू विक्री करण्यासाठी आलेल्या व्यावसायिकांना काही प्रमाणात पावसाचा त्रास सहन करावा लागला.
खराब हवामानामुळे विमान वळविले मुंबईला
दिल्ली-बेळगाव विमानफेरीला फटका
बेळगावसह परिसरात बुधवारपासून पावसाने हजेरी लावली. शुक्रवारी सकाळी ढगाळ वातावरण व त्यानंतरच्या जोरदार पावसाचा फटका विमानसेवेला बसला. दिल्लीहून बेळगावला आलेले विमान धावपट्टी न दिसल्याने वापस मुंबईला नेण्यात आले. यामुळे बेळगावला येणाऱया प्रवाशांना मुंबई येथे उतरविण्यात आले.
रोजच्याप्रमाणे स्पाईस जेट कंपनीचे विमान दिल्ली येथील विमानतळावरून बेळगावच्या दिशेने झेपावले. बेळगाव परिसरात असणाऱया ढगाळ वातावरणामुळे विमान उतरविण्यासाठी बऱयाच अडचणी येत होत्या. धावपट्टी मिळत नसल्याने हे विमान बेळगावच्या अवतीभवती घिरटय़ा घालत होते. अखेर वैमानिकाने विमान मुंबईच्या दिशेने वळविले. काही प्रवासी दिल्लीला जाण्यासाठी बेळगाव विमानतळावर सकाळी 7 वाजल्यापासून उपस्थित होते. अखेरच्या क्षणी खराब हवामानामुळे बेळगाव येथे न उतरता मुंबईकडे रवाना झाल्याचे सांगण्यात आले. यामुळे काही प्रवाशांनी प्रवासाच्या तारखा बदलून घेतल्या. तर काहींनी इतर ठिकाणाहून दिल्लीला जाणे पसंत केले. खराब हवामानाचा फटका यावषी पहिल्याच पावसात बसला.