22 हून अधिक बळी ः हिमाचल प्रदेशमध्ये 14 जणांचा मृत्यू ः उत्तराखंड, उत्तर प्रदेशलाही झोडपले
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
उत्तर भारतात शुक्रवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पर्जन्यवृष्टीचा बऱयाच राज्यांना दणका बसला आहे. हिमाचल आणि उत्तराखंड या दोन राज्यांमध्ये सायंकाळपर्यंत 22 बळींची नोंद झाली होती. हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसाने कहर केला आहे. मंडी आणि चंबा जिह्यांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. गेल्या 24 तासांत चंबा जिल्हय़ातील भाटियात 3 आणि मंडीत 10 जणांचा मृत्यू झाला. तसेच कांगडामधील शाहपूरमध्ये घर कोसळल्याने 9 वषीय मुलीचा मृत्यू झाला. दरम्यान, अन्य राज्यांमध्येही पावसाचा कहर कायम आहे. पुढील 24 तास मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. स्थानिक हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील चार दिवस मुसळधार पाऊस सुरू राहणार असल्यामुळे उत्तरेकडील राज्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
चंबा आणि मंडी जिह्यात अनेक लोक बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. हमीरपूरमध्ये 10 ते 12 घरे नदीत बुडाली. यामध्ये अडकलेल्या 19 जणांची सुटका करण्यात आली. मंडीतील गोहर येथे डोंगर कोसळल्याने काशान पंचायतीच्या जाडमान गावात एकाच कुटुंबातील 10 जण अडकले. एक महिला आणि दोन मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर सात लोक अजूनही ढिगाऱयाखाली गाडले गेले आहेत. रात्री संपूर्ण कुटुंब घरातच झोपले असताना अचानक घरामागील डोंगर कोसळल्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. दुसरीकडे, कांगडा येथे मुसळधार पावसामुळे चक्की नदीवरील पंजाब आणि हिमाचलला जोडणारा रेल्वे पूल वाहून गेला आहे. अलीकडेच हा पूल असुरक्षित घोषित करून ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ापासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.
कारसह 6 जण वाहून गेले
मंडईतील कटौला येथील बागी नाल्याला आलेल्या पुरात एक कार अडकल्यानंतर वाहनासह सहा जण वाहून गेले. 15 वषीय मुलीचा मृतदेह सापडला असून इतरांचा शोध सुरू आहे. दुसरीकडे, चंबा जिल्हय़ातील चुवडी येथील बनेत गावात दरड कोसळून तीन जण गाडले गेले आहेत.
उत्तराखंडमध्ये 8 मृत्युमुखी, अनेक जण बेपत्ता
उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनाने हाहाकार माजवला आहे. राज्यात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 13 जण बेपत्ता असल्याची माहिती प्रशासकीय पातळीवरून देण्यात आली. टिहरी जिह्यातील धनौल्टी भागात एका घराची पडझड झाली. या अपघातात एकाच कुटुंबातील सात जण गाडले गेले. यापैकी दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. उत्तराखंड राज्यात शुक्रवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानंतर राज्यातील विविध जिह्यांमध्ये हाहाकार उडाला आहे. रात्रीपासून एसडीआरएफची टीम युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्यात पूर्ण तत्परतेने काम करत आहे.