प्रतिनिधी,रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्यातील अपघातांचे प्रमाण लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व शासकीय,निमशासकीय,महामंडळे,नगरपालिका,महानगरपालिका व सर्व शासकीय अस्थापना व खासगी अस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 1 जून पासून हेल्मेट लागू करण्यात आलं आहे. अशा आदेशाचे परिपत्रक रत्नागिरी उपप्रादेशिक कार्यालय रत्नागिरी यांच्याकडून जारी करण्यात आले आहे.
परिपत्रकातील आदेशानुसार कार्यालयांमध्ये काम करण्यासाठी दुचाकीवर मागे बसून येणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील हेल्मेट सक्ती असणार आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यास मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 194 (ड) अन्वये वाहन धारकाने नियम 129 चे उल्लंघन केल्यास तो स्वत तसेच ज्या अस्थापनेतील जागेवर गुन्हा घडला असेल ती कार्यालय प्रमुख सुद्धा उपरोक्त उल्लंघनास जबाबदार मानले जाणार आहे.
हेल्मेट सक्तीमधून काहींना शिथिलता देण्यात आली आहे. राज्य महामार्ग व राष्ट्रीय महामार्ग या व्यतिरिक्त इतर रस्त्यांवर 50 सीसी पेक्षा कमी इंजिन असलेले मोपेड व पगडी परिधान केलेले शिख समुदायातील व्यक्तिस मोटार वाहन कायदा 1988 कलम 129 च्या तरतूदीनुसार शिथिलता देण्यात आली असल्याचे परिवहन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात मागील काही वर्षापासून सातत्याने रस्ते अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी होणे तसेच त्यांचा मृत्यू होण्याचे प्रमाण चिंताजनक ठरत आहे. रस्ते अपघातातील दुचाकीस्वारांच्या मृत्यूमागे हेल्मेट परिधान केलेले नसणे हे महत्वाचे कारण ठरत आहे. दुचाकी स्वारांनी हेल्मेट वापरणे सक्तीचे करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत़ असे असतानाही त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे सर्वत्र दिसून येते.
कोरोना काळात रत्नागिरी जिल्ह्यात प्रभावीपणे हेल्मेट सक्ती करण्यात आली होती. मात्र, कोरोनाचा काळ संपताच महामार्ग वगळता हेल्मेट सक्ती शिथिल करावी अशी मागणी राजकीय पक्षांकडून करण्यात आली. पुण्याच्या धर्तीवर हेल्मेट न वापरणाऱ्यांना कारवाई करू नये अशी प्रमुख मागणी करण्यात आली होती. त्यासंबधी रत्नागिरी वाहतूक पोलिसांकडून काही प्रमाणात हेल्मेट सक्ती शिथिल करण्यात आली.मात्र महामार्गावर मात्र हेल्मेट सक्ती सुरूच असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, आता पुन्हा एकदा परिवहन विभागाकडून शहरातील शासकीय व खासगी अस्थापनांमध्ये काम करणाऱ्यांना हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. मात्र याची वाहतूक पोलिसांकडून अंमलबजावणी कशी करणार असे प्रश्न उपस्थित होत आहेत. असे असले तरी उपपादेशिक परिवहन अधिकारी जयंत चव्हाण यांनी मात्र हेल्मेट परिधान केलेले नसल्यास कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.