9 कोटी 13 लाख होणार वितरित : दुसऱ्या टप्प्यात पाच हजार नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत
प्रतिनिधी /बेळगाव
जिल्ह्यात ‘लम्पी’ रोगाने पाच हजारांहून अधिक जनावरांचा मृत्यू झाला आहे. या सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सोमवारपासून भरपाई दिली जाणार आहे. जिल्ह्यातील 5 हजार 4 शेतकऱ्यांना तब्बल 9 कोटी 13 लाख 85 हजार रुपये वितरित केले जाणार आहेत, अशी माहिती पशुसंगोपन खात्याने दिली आहे.
लम्पी विषाणूजन्य रोगाची 42,225 जनावरांना लागण झाली आहे. त्यापैकी 5 हजार 120 जनावरे दगावली आहेत. त्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. दरम्यान, शासनाने जनावर दगावलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर केली आहे.
पहिल्या टप्प्यात आर्थिक मदत देण्यात आली आहे. त्याबरोबर आता दुसऱ्या टप्प्यातील आर्थिक मदतीला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपर्यंत ही मदत पोहोचविली जाणार आहे.
लम्पीने दगावलेल्या बैलासाठी 30, गायीसाठी 20 आणि वासरासाठी 5 हजार मदत दिली जाणार आहे. यामध्ये पारदर्शकता राहण्यासाठी मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे.
भटक्या जनावरांनाही लागण झाल्याने उपचाराचा पश्न गंभीर
सप्टेंबर दरम्यान लम्पीचा शिरकाव झाला होता. त्यानंतर जिल्ह्यात सर्वत्र प्रसार वाढला. त्यामुळे लागण होणाऱ्या जनावरांच्या संख्येत वाढ होत गेली. त्याबरोबर दगावलेल्या जनावरांची संख्यादेखील अधिक आहे. या सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. समाधानकारक बाब म्हणजे 3,493 जनावरे लम्पीमुक्त झाली आहेत. तर काही भटक्या जनावरांनादेखील या रोगाची लागण झाली आहे. या जनावरांच्या उपचाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने जागे होणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील काही भागात पुन्हा दुसऱ्या टप्प्यात लम्पीचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. एकीकडे प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे तर, दुसरीकडे काही भागात प्रादुर्भाव वाढत असल्याने पशुसंगोपनची डोकेदुखी वाढली आहे.
निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा
जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. जनावरांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. दुसऱ्या टप्प्यात मदतीला सुरुवात झाली आहे. 9 कोटी 13 लाख 85 हजार निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे.
– डॉ. राजीव कुलेर (सहसंचालक पशुसंगोपन खाते)