कुरुंदवाड प्रतिनिधी
समाजातील महिलेचा पती मृत्यू पावल्यास अशा विधवा महिलांच्या उदरनिर्वाहासाठी विधवा प्रथा बंद करणारा हेरवाड पॅटर्न देशात नावारूपाला आला. या गावतील माळी समाजाने विधवा महिलांना २५ हजाराची आर्थिक मदत देणार असल्याचे जाहीर केले आहे. माळी समाजाने घेतलेल्या या आदर्शवत निर्णयाचे परिसरातून कौतुक होत आहे. समाजातील अनिष्ठ प्रथे विरोधात हेरवाड येथील माळी समाजाने वेळोवेळी आदर्शवत पावले उचलली आहेत. मयत व्यक्तीच्या घरातील दिवस असो वा इतर विधी टाळून माळी समाजाने निर्णायक पाउल उचलले आहे. इतकेच नव्हे तर समाजातील अनेक बांधवांनी मरणोत्तर नेत्रदानाची चळवळही उभारली असून आज अखेर समाजातील १२ जणांचे मरणोत्तर नेत्रदान करण्यात आले आहे.माळी समाज एवढ्यावरच न थांबता समाजात सन २०१८ पासून विधवा प्रथेविरुद्ध आवाज उठविला आहे. आणि तो अंमलातही आणला असल्याची माहिती माळी समाजातील पदाधिकाऱ्यांनी दिली.
नुकत्याच झालेल्या संत सावता माळी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने समाजातील बांधवांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत समाजातील महिला जर विधवा झाली तर विधवा प्रथा बंदीची अंमल बजावणी करून त्या महिलेच्या उदरनिर्वाहासाठी २५ हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचे सध्या स्वागत केले जात आहे. या बैठकीत सुनिल माळी, बाबुराव माळी, बाळासो माळी, अशोक माळी, खंडू कावरे, बजरंग माळी, दिलीप माळी, दिनकर माळी, प्रकाश माळी, श्रीकांत माळी, दत्तात्रय माळी, तुकाराम माळी, अंकुश माळी आदी समाजबांधव उपस्थित होते
२०१८ मध्ये माळी समाजाचा पहिला विधवा महिला प्रथा बंदीचा आवाज हेरवाड येथून उठविण्यात आला. आणि बघता बघता राज्य शासनाला याची दखल घ्यावी लागली.विधवा प्रथा बंदीचा निर्णय हेरवाड ग्रामपंचायतीने चालू वर्षात घेतला, पण सन २०१८ मध्ये माळी समाजाने विधवा प्रथा बंदी बाबत निर्णय घेतला होता, असे समाजातील पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे प्रत्येक चांगल्या निर्णयात आजपर्यंत पुढे असल्याचे माळी समाजाने दाखवून दिले आहे. माळी समाजाने अगोदरपासूनच विविध समाजपयोगी उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. समाजातील प्रत्येक बांधवाने नेत्रदानाचा फॉर्म भरला आहे. सध्या विधवा महिलाच्या उदरनिर्वाहासाठी आम्ही २५ हजाराची मदत जाहीर केली आहे. असे समाजाचे अध्यक्ष सुनील माळी यांनी यावेळी सांगितले यापुढेही विधवा महिलांनी प्रोत्साहन देण्यासाठी विविध व्यवसायाच्या माध्यमातून संधी उपलब्ध करून देण्यात येईल असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
ग्रामपंचायती ला शासकीय परिपत्रके काढून विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव संमत करण्यात आला. विधवा प्रथा बंद झाली पण यापुढे काय? असा प्रश्न अनुत्तरीत होता, मात्र हेरवाड येथील माळी समाजाने विधवा होणाऱ्या महिलांना २५ हजाराची मदत घोषित करून त्यांच्या उदरनिर्वाह बरोबर त्यांना आर्थिक पाठबळ देण्याचा आदर्शवत उपक्रम घेतला आहे. त्यामुळे हेरवाड येथील माळी समाजाचे अनुकरण सर्व समाजाने करून विधवा होणाऱ्या महिलांना आपल्यापरी होईल तेवढी आर्थिक मदत केल्यास विधवा प्रथा बंदीला बळकटी येईल हे मात्र निश्चित.