विधान परिषद सभापतीपदी तिसऱ्यांदा निवड
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगावच्या हिवाळी विधिमंडळ अधिवेशनामध्ये पुन्हा विधान परिषद सभापतीची निवड करण्यात आली. तिसऱ्यांदा बसवराज होरट्टी यांनी बाजी मारली असून त्यांची बिनविरोध निवड बुधवारी करण्यात आली आहे. विधान परिषदेचे तिसऱ्या दिवसाच्या कामकाजाला सुरूवात झाल्यानंतर पहिल्याच प्रस्तावामध्ये त्यांची निवड करण्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षांनीही त्यांना पाठिंबा दिल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.
बुधवारी विधान परिषदेच्या कामकाजाला सुरूवात झाल्यानंतर हंगामी सभापती रघुनाथराव मलकापुरे यांनी बसवराज होरट्टी यांची सभापतीपदी निवड करण्याचा प्रस्ताव मांडला.
त्याला विधान परिषद सदस्य नारायण स्वामी यांनी अनुमोदन दिले. तर डॉ. तेजस्विनी यांनीही पक्षाच्यावतीने सहमती दिली. त्यानंतर विरोधी पक्षनेते हरिप्रसाद यांनी त्याला पाठिंबा असल्याचे जाहीर केले. त्यामुळे बसवराज होरट्टी तिसऱ्यांदा सभापतीपदी विराजमान झाले.
सर्वांनी अभिनंदन करुन त्यांना त्या पदावर बसविले. त्यानंतर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बसवराज होरट्टी यांच्याबद्दल सभागृहात माहिती दिली. अत्यंत अनुभवी आणि ज्येष्ठ सदस्यांची सभापदी निवड झाल्यानंतर मला आनंद वाटत आहे. त्यांना मोठा अनुभव आहे. ते सलग आठवेळा विधान परिषदेवर निवडून आले आहेत. सभागृह कसे चालवायचे, हे त्यांना चांगलेच माहिती आहे. 42 वर्षे त्यांनी विधान परिषदेमध्ये काम केले आहे. त्यांची कार्यशैली आणि मतदारांविषयी असलेला आदर त्यांनी दाखवून दिला आहे. शिक्षणमंत्री म्हणूनही त्यांनी काम केल्यामुळे त्यांना मोठा अनुभव आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
केवळ सत्ताधारीच नाही तर विरोधकांचे म्हणणे ऐकून त्यांना देखील न्याय देण्याचा प्रयत्न नेहमीच केला आहे. धारवाड, हुबळी या परिसरासाठी त्यांनी दिलेले योगदान मोठे आहे. विरोधी पक्षनेते हरिप्रसाद यांनीही एक उत्तम सभागृह चालविणारे सभापती म्हणून बसवराज होरट्टी यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या निवडीने आम्हाला देखील आनंद झाला आहे. हंगामी सभापती रघुनाथराव मलकापुरे यांनीही उत्तम प्रकारे काम पाहिले. याबद्दल त्यांचेही अभिनंदन हरिप्रसाद यांनी केले आहे.
बसवराज होरट्टी यांची सभापती निवड झाल्यानंतर सकाळच्या सत्रामध्ये सर्वच सदस्यांनी त्यांचे अभिनंदन करण्यासाठी भाषणे केली. सभागृहाचे नेते कोटा श्रीनिवास यांनी बसवराज होरट्टी यांच्याकडे गुणात्मकता आहे. त्यांचे कामकाज पारदर्शक आहे. ते काँग्रेस, जेडीएस आणि बीजेपी पक्षातर्फे काम करत आहेत. त्यामुळे त्यांचे सर्वांशीच संबंध चांगले आहेत. त्यामुळे सभागृह चालविणे त्यांना सोयीस्कर आहे. विरोधी पक्षानेही त्यांना पाठिंबा दिला. याबद्दल त्यांचेही अभिनंदन मानले.
विधानसभेत आज सीमाप्रश्नावर ठराव
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी गुरुवारी विधानसभेत मुख्यमंत्री बसवराज बोम्माई हे सरकारची बाजू मांडणार आहेत. त्यानंतर सीमाप्रश्नी ठरावही मांडण्यात येणार आहे. स्वत: मुख्यमंत्र्यांनी भोजन विरामानंतर ही माहिती दिली. मंगळवारी अधिवेशनात सीमाप्रश्नी चर्चा झाली होती. ठरल्याप्रमाणे बुधवारी मुख्यमंत्री या चर्चेला उत्तर देणार होते. त्यानंतर ठराव मांडण्याचे ठरविण्यात आले होते. सभाध्यक्ष विश्वेश्वर हेगडे-कागेरी बुधवारी विधानसभेत नव्हते. त्यामुळे सभाध्यक्षांनी आपल्याला सूचना दिली आहे. आपण सभागृहात असतानाच सीमाप्रश्नी सरकारचे उत्तर देण्याचे सांगितले आहे. म्हणून आपण गुरुवारी उत्तर देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. बुधवारी सभाध्यक्षांच्या अनुपस्थितीत आसनावर कुमार बंगारप्पा हे विराजमान होते. दिवसभर त्यांनी कामकाज चालविले. गुरुवारी प्रश्नोत्तराच्या तासानंतर सीमाप्रश्नावरील चर्चेला मुख्यमंत्री उत्तर देणार आहेत.