ओडिशातील बालासोर जिह्यात बाहानगा बाजार स्टेशनजवळ शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास तीन रेल्वे गाड्यांच्या विचित्र अपघातात जवळपास तीनशे प्रवाशांना आपला जीव गमावावा लागला आहे. प्रत्यक्षात जाहीर मृतांची संख्या 288 असून हा आकडा आणखी वाढण्याची भीती रेल्वेने आधीच व्यक्त केली आहे. या घटनेने देशभर हळहळ व्यक्त होत आहे तर जगभर भारतीय रेल्वेची नाचक्की झाली आहे. वर्षानुवर्षे मोठ्या दुर्घटना घडतात आणि तरीही त्यातून रेल्वे मंत्रालय काही शिकत नाही. जगभरातल्या प्रणाली लागू केल्याचे दावे केले जातात आणि प्रत्येक नव्या अपघातात ते फोल ठरतात. गतवर्षी गाजावाजा करून भारतीय बनावटीची प्रणाली म्हणून कवच नावाची यंत्रणा कार्यान्वित केली. आता एकही अपघात होणार नाही असा दावा मंत्रालयाने केला. तो सपशेल फोल ठरला. अपघातग्रस्त परिसरात ही यंत्रणाच कार्यरत नव्हती असे आता सांगितले जात आहे. मग देशात एकही अपघात घडणार नाही असे कशाच्या जोरावर सांगितले गेले होते? असा प्रश्न देशभरातील रेल्वे प्रवासी विचारत आहेत. तीन रेल्वे एकमेकांना समोर समोर धडकल्या अशी चर्चा उठली जी चुकीची होती. कोलकात्यानजिकच्या शालिमार येथून चेन्नईच्या दिशेने निघालेली कोरोमंडल एक्सप्रेस शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास बाहानगा रेल्वे स्टेशनजवळ होती. पण तिथे उभ्या असलेल्या एका मालगाडीला ही गाडी धडकली. या गाडीचे इंजिन मालगाडीत घुसले. या धडकेनंतर कोरोमंडल एक्सप्रेसचे डबे बाजूच्या रुळावर अस्ताव्यस्त पसरले. त्याचवेळी बंगळुरूनजिकच्या यशवंतपूर स्थानकावरून कोलकात्याजवळच्या हावडा स्थानकापर्यंत धावणारी यशवंतपूर-हावडा एक्सप्रेस याठिकाणी आली. रुळांवर आडव्यातिडव्या पसरलेल्या डब्यांना या गाडीने धडक दिली. जवळपास 120 च्या गतीने दोन्ही एक्स्प्रेस धावत होत्या. कोणत्याच गाडीची समोरासमोर धडक झालेली नाही. पण दुर्घटना इतकी गंभीर आहे की त्यात मृतांचा आकडा तिनशेच्या घरात पोहोचला आहे. कोरोमंडल एक्सप्रेसला पंधरा वर्षात दुस्रयांदा अपघात झाला आहे. त्यामुळे कवच यंत्रणा या रेल्वेच्या धावक्षेत्रात तरी आवश्यकच होती. पण त्याकडे दुर्लक्ष केले गेले. याप्रकरणी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचा राजीनामा जर कोणीही मागितला तर ती मागणी चुकीची ठरत नाही. ते ज्या खात्याचे प्रतिनिधित्व करत आहेत त्यातील ही अलीकडच्या काळातील सर्वात मोठी दुर्घटना आहे. केवळ मोदी सरकारच्या काळात 2014 पासून झालेल्या अपघातातील मृतांची संख्या पाहिली तर ती 297 इतकी होते आणि एकट्या या अपघातात मृतांचा आकडा पाहिला तर तो सर्व अपघातातील मृतांच्या संख्येइतका ठरतो. त्यामुळे अपघात घडल्यानंतर ते किती काळ तळ ठोकून होते या सांगण्याला काही अर्थ नाही. ते भारतीय प्रशासकीय सेवेतील उच्चपदस्थ अधिकारी होते आणि त्यानंतर त्यांना रेल्वे मंत्री केले असेल तर त्यांची जबाबदारी अधिक वाढते. त्यांनीही पदाला चिकटून राहण्यापेक्षा ते सोडण्याची धिटाई दाखवली असती तर ते मंत्रीपदी राहून जितकी सुधारणा होणार नाही तितका दबाव यंत्रणेवर येऊन ती सक्षम झाली असती. अर्थात ते होईल असे वाटत नाही. त्यामुळे आता नुकसान भरपाईचा विचार करणे इतकेच हाती उरते. जनता जोपर्यंत याबद्दल जाब विचारणार नाही तोपर्यंत यंत्रणेचे निर्ढावलेपण तसेच सोसावे लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या नातेवाईकांना दिलासा देताना या अपघातात कारणीभूत असणाऱ्यांवर कडक कारवाईचे आश्वासन दिले आहे. मात्र त्यामुळे तीनशे जीव परत येणार नाहीत. आपल्या माता-पितांच्या मृत्यूने हेलावलेल्या मुलाचा शोक करून मृत्यू झाला अशी दुर्दैवी माहिती आता जगासमोर आली आहे. अशा भयानक आणि तितक्याच हृदयद्रावक घटनांमध्ये जखमी होणाऱ्यांच्या आयुष्यावरही खूप भीषण परिणाम होत असतात. आता त्यांचे आयुष्य सावरण्यासाठी रेल्वे काही करू शकते का? की केवळ जखमींना दिलेल्या मदतीच्या रकमेपुरतीच त्यांची संवेदना टिकून राहते आणि जखमी आयुष्यभर आपल्या परिवारावर ओझे बनून स्वत:ला दोष देत राहतो याचा मागोवा सामाजिक संघटनांनी घेऊन मृतांच्या आणि जखमींच्या न्यायासाठी झटले पाहिजे. असे लोक पीडितांना भेटावेत इतकीच आपण प्रार्थना करू शकतो. कोरोमंडल एक्सप्रेसचा अपघात हा इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमधील बदलामुळे झाला आहे, कवच यंत्रणेशी काहीही संबंध नाही. पॉईंट मशीन, इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग यामध्ये झालेल्या बदलांमुळे अपघात घडला आहे. पण हे बदल कशामुळे झाले, कुणी केले, याचा शोध घेण्याचे काम रेल्वे सुरक्षा आयुक्तांना करावे लागेल असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे. हा घातपात असावा असे त्यांचे मत आहे का? ते त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झालेले नाही. तर एका प्रश्नाला उत्तर देताना अपघाताचे कारण आपल्याला कळाले आहे. त्यासाठी जबाबदार कोण आहेत, तेसुद्धा आपल्या लक्षात आलेले आहे. पण सध्या आम्ही येथील परिस्थिती पूर्ववत करण्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे, असे सांगून त्यांनी अधिक सांगणे टाळले आहे. अशा अपघातांची कारणे समाजासमोर वेळीच येणे आवश्यक असते. काळ जाईल तसे लोकांच्या समोरचे प्राधान्यक्रम बदलतात आणि त्याबाबत समाजातून विचारणा होणे थांबते. यंत्रणा नेहमीच याचा लाभ घेऊन सत्य कपाटबंद करून टाकतात. या बाबतीत असे घडू नये. सत्य लोकांसमोर प्रखरतेने यावे. देशात रेल्वेचा वेग वाढत असताना या दुर्घटना थांबल्या पाहिजेत. एक सक्षम यंत्रणा कार्यरत असली पाहिजे. दुर्घटना घडल्यानंतर हात वर करणारे मंत्री आणि अपघात नव्या यंत्रणेमुळे नव्हे तर जुन्या यंत्रणेत चूक केल्याने झाला असे सांगणे आता नव्या भारताच्या प्रतिमेला शोभणारे नाही. अजून किती बळी घेणार हा जनतेचा प्रश्न केवळ विरोधी पक्षांनी नव्हे तर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्र्यांसह यंत्रणेला विचारला पाहिजे.
Trending
- मुख्याध्यापक संघाचा फॉर्मुला ठरला; 23 जागांपैकी दादा लाड गटाला 12 तर बाबा पाटील गटाला 11 जागा
- हातकणंगलेतून लढण्यास चेतन नरकेंचा नकार! ठाकरे गटाकडून आलेल्या ऑफर नाकारली; कोल्हापूरात होणार तिरंगी लढत
- ‘आम्ही टोल संपवत आहोत’: नितीन गडकरी
- स्वदेशी ‘मार्क-1ए’ विमानाकडून यशस्वी उड्डाण
- उत्तराखंडमधील नानकमत्ता साहिब गुरुद्वाराच्या डेरा प्रमुखाची गोळ्या झाडून हत्या
- केजरीवालचे गोवा ‘कनेक्शन’ उघड
- सांगोल्डाचा उपसरपंच उल्हास मोरजकर अपात्र
- मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत महाराष्ट्रात ‘स्टार’ प्रचारक