अध्याय विसावा
संसार सागर तरून जाण्यासाठी सद्गुरू कर्णधार होऊन मार्गदर्शन करत असतात. वास्तविक पाहता सद्गुरु हे भगवंतांचेच रूप असते म्हणजे प्रत्यक्ष भगवंतच कर्णधार असतात. त्यांच्या नेतृत्वाखाली संसार सागर तरून आपला उद्धार करून घेणे हे मनुष्य जन्माचे मुख्य उद्दिष्ट आहे हे लक्षात न घेता मनुष्य त्याचा नरदेह विषयोपभोगात खर्च करतो हे सर्वथा अनुचित होय. असे सांगून झाल्यावर भगवंत पुढे म्हणाले, आता वेदार्थाला अनुसरून आपल्या हितावर दृष्टि ठेवून सावध असणारे उत्तम लोक स्वभावानेच अत्यंत विरक्त असतात. कर्मामध्ये दोष पाहून त्यांचा उबग आल्यामुळे विरक्त झाल्याने इंद्रियांवर ताबा मिळवून अभ्यासाने आपले मन स्थिर करतात. जो कर्मारंभीच विरक्त असतो, फलाच्या आशेला ज्याचे चित्त शिवतही नाही ‘मला मोक्ष मिळावा’ असेही त्याच्या अंतःकरणाला आठवत नाही. वैराग्याची दृष्टि खडतर असल्याने तो इंद्रियांना विषयाची गोष्टसुद्धा काढू देत नाही. तो कडकडीत मनोनिग्रही असतो आणि स्वरूपाची धारणा नेटाने दृढ राखतो. श्रवण व मनन करून माझ्या स्वरूपाचे नेहमी अनुसंधान ठेवतो. अखंड माझाच निदिध्यास करत राहतो. मन तिळभरसुद्धा ढळू देत नाही. धारणेच्या बळाने आत्मस्वरूपामध्येच मन स्थिर ठेवतो. निजबोधाने ते निश्चळ राखतो परंतु मन चंचल असल्याने एकदम आत्मस्वरूपामध्ये निश्चळ कसे होते? या उद्धवाच्या प्रश्नाचे उत्तर देताना भगवंत म्हणाले, मन स्थिर करताना जर चंचल होऊन इकडेतिकडे भटकू लागले, तर ताबडतोब आळस न करता त्याची समजूत घालून ते आपल्या ताब्यात आणावे. आसन अढळ करून स्वतः सावध राहून सदगुरूचे चरण स्मरून स्वरूपातच मनाला ठेवीत जावे. मनाला विषयदान दिले नाही, तर हट्टाने अधिकच क्षुब्ध होते. अशा वेळी स्वरूपानुसंधान न सोडता त्याला विधिनुसार अन्नपाणी देत जावे. सर्पाला अमृत पाजले, तर त्याचे पुन्हा विष होते त्याप्रमाणे मनाला विषयसुख दिले तर ते पहिल्यापेक्षा अधिक खवळते. याकरिता मनाला विषयभोग कसे द्यायचे ते सांगतो. असे केले की, ते स्वाधीन राहील. मनाला मोकळे न सोडता, स्वरूपानुसंधानही न टाकता, अन्नपाणी व निद्रा हे विषय मनाला देणे निजहिताचे असते पण मनावर जो विश्वास ठेवतो, त्याला कामक्रोध नागवून सोडतात. संकल्पविकल्प त्याला लुटतात आणि महामोह त्याला ग्रासून टाकतो. मनाचे बळ मोठे आहे, हे लक्षात आणून विवेकाचा साखळदंड त्याच्या पायास बांधावा म्हणजे तो त्याला इकडे तिकडे हलू देत नाही. त्यामुळे ते आपोआपच स्थिर होते. मन आणि विवेक या दोहोंचे ऐक्मय झाले की, बुद्धि सत्त्वगुणाने युक्त होऊन ती विषयाचे मूळच उपटून टाकते आणि सविकार उपाधी तोडून टाकते.
मन जिकडे जिकडे पळून जाते, तिकडे तिकडे विवेक हा दत्त म्हणून उभाच असतो आणि तो सत्त्वशील बुद्धीच्या साहाय्याने मनाचे पायच मोडून टाकतो.
अशा प्रकारे मनाचे बळ खुंटले म्हणजे, पाण्याची गार ज्याप्रमाणे नदीच्या पाण्यातच वस्तीला राहते, त्याप्रमाणे मनही स्थिर होते. याप्रकारे मन जेव्हा स्वतः स्वरूपामध्ये समाधान पावते, तोच योग अत्यंत श्रे÷ असून त्याच्या योगाने जीवाला आणि शिवालाही समाधान होते.
जीवाची आणि परमात्म्याची एकात्मता करणे तोच खरोखर ‘श्रे÷ योग’ होय. याचविषयीचे निरूपण अश्वाच्या दृष्टांताने भगवंत सांगत आहेत. ते म्हणाले, खोगीर न घातलेल्या घोडय़ाला चाबुकस्वार जसा आपल्या हुकमात चालवितो, पुढे नीट चाल लावण्यासाठी वाकडेतिकडे पाऊल पडू नये म्हणून दोऱयानी रेटून धरतो त्या वेळी तो जे जे पाऊल योग्य रीतीने टाकतो, त्याबद्दल तो त्याला शाबासकी देतो व ‘भले भले’ म्हणून चुचकारतो. पण जेथे त्याचे पाउल वाकडे पडते, तेथें तो वर्मावर फटकारा मारतो.
तो जेव्हा अडून हट्टाने आपली खोड टाकीतच नाही, तेव्हा त्याला तो थोडीशी मोकळीक देतो, अशा युक्तिप्रयुक्तीने तो त्याला आपल्या कबजात आणत असतो.
क्रमशः