प्रतिकिलो 160 रुपये दर, सर्वसामान्य हैराण
बेळगाव : इंधन, वीज, गॅस दरवाढीबरोबरच कडधान्य आणि डाळींच्या किमतीत भरमसाट वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना जगणे असह्या होऊ लागले आहे. विशेषत: 120 रुपये किलो असणारी तूरडाळ 160 रुपये प्रतिकिलो झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेबरोबर गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. शिवाय डाळ तडका व वरणही आता महाग झाले आहे. मागील काही दिवसांपासून तूरडाळीच्या किमतीत सातत्याने वाढ होऊ लागली आहे. तूरडाळीची किंमत गगनाला भिडल्याने आमटी करताना गृहिणीला विचार करावा लागत आहे. याबरोबरच हॉटेल, धाबे, मेस व इतर लहान व्यावसायिकांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. शिवाय खानावळींमध्ये ताटाची किंमत वाढली आहे. मागील काही दिवसात खाद्यतेल, किराणा माल, कडधान्ये आणि डाळींच्या किमती सातत्याने वाढू लागल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना खावे तरी काय? असा प्रश्न पडला आहे. भाजीपाला आणि इतर काही साहित्याचे दर स्थिर असले तरी कडधान्ये आणि डाळींचे दर वाढू लागले आहेत. त्यामुळे दैनंदिन आहारात वापरणाऱ्या डाळींबाबत आता चिंता व्यक्त होऊ लागली आहे. किरकोळ बाजारात तूरडाळ 160 रुपये किलो दराने विकली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. आधीच महागाईने जनता हैराण झाली आहे.