पुणे / प्रतिनिधी :
शिक्षक भरतीच्या मागणीसाठी डीटीएड, बीएड स्टुडंट्स असोसिएशनतर्फे पुण्यात शिक्षण विभागाच्या कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले आहे. ‘कोण म्हणतो देत नाय, घेतल्याशिवाय राहणार नाय, शिक्षक भरती झालीच पाहिजे, अशी घोषणाबाजी सोमवारी करण्यात आली.
संघटनेचे अध्यक्ष संतोष मगर म्हणाले, राज्यात 2019 मध्ये 12 हजार पदांसाठीची शिक्षक भरती पवित्र संकेतस्थळातर्फे सुरू करण्यात आली. मात्र, चार वर्षे होऊनही अद्याप शिक्षक भरती झालेली नाही. त्यात आता आणखी 30 हजार शिक्षकांची पदे भरण्याची घोषणा राज्य शासनाने केली आहे. या पार्श्वभूमीवर रखडलेली शिक्षक भरती करण्याच्या मागणीसाठी राज्यभरातील उमेदवारांसह डीटीएड बीएड स्टुडंट्स असोसिएशनतर्फे पुण्यातील शिक्षण विभागाच्या कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले. शिक्षक भरती प्रक्रियेतील माजी सैनिक, अपात्र, गैरहजर उमेदवारांची यादी प्रसिद्ध करावी, समांतर आरक्षणात झालेला अन्याय दूर करावा, विभागनिहाय शिक्षक भरती करण्यात येऊ नये, भरती प्रक्रिया टप्प्याटप्प्याने न करता एकाच टप्प्यात केंद्रीय पद्धतीने पूर्ण करावी, शिक्षक भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने लवकरात लवकर घ्यावी, आदी आमच्या मागण्या आहेत.
अधिक वाचा : कोचर दाम्पत्याला दिलासा; तात्काळ सुटका करण्याचे हायकोर्टाचे निर्देश