ऑनलाईन टीम / तरुण भारत :
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. लोकसभा अध्यक्षांनी केलेल्या या कारवाईनंतर राहुल गांधी यांनी दोन ओळींचं ट्विट केलं आहे. “मी भारताच्या आवाजासाठी लढत आहे आणि त्यासाठी मी कोणतीही किंमत मोजायला तयार आहे”, असे राहुल गांधींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
कर्नाटकच्या कोलारमध्ये मोदी आडनावाचे सर्वजण चोर कसे असतात? असे वक्तव्य राहुल गांधीनी प्रचारादरम्यान केलं होतं. त्यानंतर भाजपच्या नेत्यांकडून राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात सुरतमधील सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली. त्यानंतर 27 मिनिटांनी त्यांना जामीनही मंजूर केला. तसेच उच्च न्यायालयात अपिल करण्यासाठी त्यांना 30 दिवसांची मुदतही दिली. जामिनाला 24 तास पूर्ण होत नाहीत, त्यापूर्वीच राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.
दरम्यान, राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. देशातील काँग्रेस आक्रमक झाली असून, भाजपने सूडाचे राजकारण चालवले आहे. भाजपच्या हुकूमशाहीच्या अंताला आता सुरूवात झाल्याची प्रतिक्रीया काँग्रेस नेत्यांमधून येत आहे.