पुणे / प्रतिनिधी :
पहाटेच्या शपथविधीबाबत देवेंद्र फडणवीस यांनाच अधिक माहिती विचारायला हवी. इतक्या दिवसांनी त्यांनी हे प्रकरण का काढले, हाच मुळात प्रश्न आहे. तथापि, त्यांच्या वक्तव्याला उत्तर देऊन मी त्यांचे महत्त्व वाढवणार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी चेंडू पुन्हा फडणवीसांच्या कोर्टात ढकलला.
पुण्यात एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पहाटेचा शपथविधी शरद पवार यांच्या संमतीने घडल्याचा गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला होता. हा दावा पवार यांनी फेटाळला होता. आज पुन्हा याबाबत छेडले असता पवार म्हणाले, या बाबत काय ते फडणवीस यांनाच विचारायला हवे. मला यावर बोलून त्यांचे महत्त्व वाढवायचे नाही. ते आत्ताच यावर का बोलतात, हाच मुळात प्रश्न आहे.
महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात नुकतीच सुनावणी झाली. यावर भाष्य करताना पवार म्हणाले, मी ऐकले की मंगळवारी याचा निर्णय येऊ शकतो. बघू आता मंगळवारी काय होते. हे सर्व इंटरेस्टिंग आहे. काय होते हे सांगणे नक्कीच अवघड आहे. गिरीश बापट यांना खरोखरच प्रचारात आणण्याची गरज होती का, हे मला माहिती नाही. काही दिवसांपूर्वीच गिरीश बापट यांना मी भेटून आलो. त्यांची प्रकृती चांगली नाही. त्यांच्या यातना वाढू नये एवढीच अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया देतानाच आसामने ज्योतिर्लिंग भीमाशंकरला नाही, तर आमच्याकडे असल्याचा केलेला दावा अर्थहीन आहे. अवघ्या देशाला 12 ज्योतिर्लिंग कुठे आहेत, हे ठाऊक आहे. असे असताना ज्योतिर्लिंगाची जागा बदलण्यापर्यंत यांची मजल कशी जाते, अशा शब्दांत त्यांनी आसाम सरकारबद्दल नाराजी व्यक्त केली.
पवारही कसबा, चिंचवडच्या प्रचारात
पुण्यातील कसबा व पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीसाठी शरद पवारही मैदानात उतरले आहेत. कसबा पोटनिवडणुकीसाठी शरद पवारांची सभा येत्या 22 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 4 ते 9 या वेळेत होणार आहे. तर चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी याच दिवशी सकाळी 11 वाजता होणार शरद पवारांची सभा पार पडणार आहे. दोन्ही उमेदवार मविआचे आहेत. त्यामुळे एका ठिकाणी प्रचाराला गेल्यावर दुसऱया ठिकाणी जावेच लागते, अशी मिश्कील टिप्पणी पवार यांनी यासंदर्भात बोलताना केली.