भारतातील विश्वचषक स्पर्धेत सहभागाचा विषय प्रामुख्याने चर्चिला जाण्याची शक्यता
वृत्तसंस्था/ दुबई
आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाचे (आयसीसी) अध्यक्ष ग्रेग बार्कले आणि सीईओ ज्योफ अॅलार्डिस हे पाकिस्तानला भेट देणार आहेत. या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेतील पाकच्या सहभागाचा विषय यावेळी होणाऱ्या चर्चेवर वर्चस्व गाजविण्याची शक्यता आहे. हा दौरा पूर्ण सदस्य असलेल्या देशांना दिल्या जाणाऱ्या नियमित भेटींच्या मालिकेचा भाग आहे.
भारताचे पाकिस्तानसोबतचे तणावपूर्ण संबंध लक्षात घेता पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) संचालक नजम सेठी यांनी पाकिस्तान सरकार पाकिस्तान संघाला भारतात येऊ न देण्याची शक्यता म्हटले आहे. विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक 7 जूनपासून ओव्हल येथे सुरू होणाऱ्या जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्यावेळी प्रसिद्ध केले जाणार असून या स्पर्धेतील पाकिस्तानच्या सहभागाबाबत साशंकता आहे.
आयसीसीचे महाव्यवस्थापक वसिम खान यांनी या विषयावर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील चर्चा अजूनही सुरू असल्याचे सांगितले आहे. सप्टेंबरमध्ये होणार असलेल्या आशिया चषक स्पर्धेसाठी भारताने पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार दिल्यानंतर हे घडले आहे आणि ‘पीसीबी’ने प्रस्तावित केलेल्या हायब्रिड स्वरूपाला दोन्ही पक्षांनी सहमती दर्शवलेली नाही. सदर प्रस्तावानुसार, पाकिस्तानमध्ये आशिया चषकातील 13 सामन्यांपैकी फक्त चार सामने होतील. अंतिम फेरीसह नऊ सामने तटस्थ ठिकाणी खेळवले जातील. पाकिस्तान या स्पर्धेचे अधिकृत यजमान असले, तरी पीसीबीच्या नियोजनानुसार स्पर्धा घेण्यास आशियाई क्रिकेट मंडळाने अद्याप मान्यता दिलेली नाही.