ऑनलाईन टीम/तरुण भारत
Uddhav Thackeray On Sanjay Raut In Mumbai : पत्राचाळ घोटाळा प्रकरणात मुंबईतील पीएमएलए कोर्टानं बुधवारी शिवसेनेचे खासदार संजय राऊतांना (Sanjay Raut) जामीन मंजुर केला. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आज संजय राऊतांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांसोबत एक पत्रकार परिषद घेतली आहे. त्यात त्यांनी भाजपसह केंद्र सरकारवर जोरदार फटकेबाजी केली आहे.
दरम्यान, आज राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज्याचे नेतृत्व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) करत असल्याचं म्हणत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला. तसेच “उपमुख्यमंत्री राज्याचं नेतृत्व करत आहेत. मी लवकरच त्यांची भेट घेणार आहे. तसेच आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना भेटणार आहे,” असेही संजय राऊत यांनी म्हटलं.
हे ही वाचा : संजय राऊतांनी केलं शिंदे-फडणवीस सरकारचे कौतुक; म्हणाले,मी ईडीवर टीका करणार नाही
राऊत यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी मुंबईतील संजय राऊतांसोबत संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, संजय राऊतांना काय करायचं आहे, तो ते उघडपणे करतो, तुम्हाला आता वाटत असेल की त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेटण्याबाबत वक्तव्य केलं आहे. परंतु त्याला मांडवली करायची असेल तर तो १०० दिवसांपेक्षा जास्त काळ तुरुंगात राहिला नसता. परंतु त्यानं दाखवून दिलं आहे की न घाबरता आपण कसं जिंकू शकतो किंवा लढू शकतो. याचं एक उदाहरण त्यानं केवळ महाराष्ट्रापुरतंच नाही तर देशापुरतं उभं केलं आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांचं तोंडभरून कौतुक केलं आहे.
संजय राऊत हा माझा जीवलग मित्र आहे. तो कायम शिवसेनेसाठी कायम लढत आलेला आहे. आता न्यायदेवतेनं त्याला न्याय दिला असून त्याला खोट्या केसेसमध्ये पुन्हा अडकवलं जाऊ शकतं, परंतु आता आम्ही शांत बसणार नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला आहे.