ऑनलाईन टीम/तरुण भारत
राज्यात मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालीसावरुन वातावरण तापलेलं आहे. राज ठाकरेंच्या (raj thacheray) गुढी पाडव्याच्या दिवशी झालेल्या सभेनंतर राज्यात विविध मुद्यांवरून वादंग सुरु झाला आहे. याच वादंगाच्या पार्श्वभूमीवर आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (dilip walse patil) यांनी पत्रकारपरिषदेत बोलताना यावर भाष्य केलं. तसेच, विरोधकांकडून जाणीवपूर्वक राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासाठी प्रय़त्न केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. याचबरोबर राणा दाम्पत्य आणि शिवसेनेतील (shvsena) वादावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली. (If anyone wants to read Hanuman Chalisa, he should read it at home – Home Minister)
गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले, “मुंबई (mumbai) आणि राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ही अतिशय उत्तम आहे. परंतु काही लोक राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्यासाठी विविध घटनांच्या माध्यमातून प्रयत्न करत आहेत. तसेच राणा दाम्पत्य मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण करणार आहे. त्यांनी तसा इशाराही दिला आहे. यावर बोलताना वळसे पाटील यांनी राणा दाम्पत्याच्या कुठल्याही प्रश्नावर मला उत्तर द्यायचं नाही. परंतु मी एवढंच या निमित्त सांगतो की, मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री आम्ही कुणीही या संदर्भातील कुठल्याही वेगळ्या सूचना आम्ही देत नाही. या संदर्भातील सर्व निर्णय हे पोलीस आयुक्तांनी घेऊन कारवाई करायची असते आणि त्या दृष्टीने मुंबईचे पोलीस आयुक्त कारवाई करतात.”
तसेच पुढे बोलताना गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले, हनुमान चालीसा कोणाला वाचायची असेल तर आपल्या घरी वाचावी, अमरावतीच्या घरी वाचावी किंवा मुंबईतील किंवा दिल्लीतील घरी वाचावी. असा हट्टा कशासाठी की याच ठिकाणी जाऊन वाचायची. या आणि यासारख्या अनेक मग कोरोना काळात देखील मंदिर बंद आहेत, मंदिरं सुरू करा त्यावरून आरत्या, महाआरत्या कराच्या. असे वेगवेगळे प्रकार करून विरोधी पक्षाच्यावतीने आज राज्यात एक असं दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय, की या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था शिल्लक राहिली नाही म्हणून राष्ट्रपती राजवट लावा. पण ते इतकं सोपं नाही. या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे अबाधित आहे.” असंही यावेळी गृहमंत्री वळसे पाटील यांनी बोलून दाखवलं.