कोल्हापूर प्रतिनिधी
लाल-पिवळे झेंडे घेऊन महाराष्ट्रातील गाड्या फोडल्या त्या कुणी फोडल्या? असा सवाल आमदार रोहित पवार यांनी करत बेळगावमधील मराठी माणसांसाठी तुमचे नेते का गेले नाहीत? असा सवाल राज्य सरकाला केला. जर महाराष्ट्र सरकारने ताकद लावली तर ही केस आपण जिंकू असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला. ते कोल्हापूरात पत्रकार परिषदेत बोलत होते.
आमदार रोहित पवारांनी बेळगाव दौरा केल्यानंतर कोल्हापुरात येऊन पत्रकारांशी संवाद साधला. बेळगावला जाण्यासाठी वेगळं कारण नव्हतं नसायला देखील पाहिजे, बेळगावला जाण्यास कुणाची परवानगी घेण्याची गरज नाही. बेळगाव हे महाराष्ट्रातच असल्यासारखं वाटतं, असे पवार म्हणाले.
महाराष्ट्र-कर्नाटक वाद केवळ राजकीय दृष्टिकोन डोळयासमोर ठेवून वातावरण तयार करण्यात आलं. पवार साहेब यांनी अल्टिमेटम दिल्यानंतर वातावरण काहीसं बदलले. पण महाराष्ट्रातील नेत्यांनी बेळगाव येथे जाण्याचे जाहीर केल्यानंतर ते गेले नाहीत. 6 तारीख झाल्यानंतर देखील महाराष्ट्रातील मंत्री गेले नाहीत.हे मंत्री गेले नसल्यामुळे सीमाभागातील मराठी माणसापर्यंत वेगळा संदेश जातो. असेही पवार म्हणाले.
ज्या पद्धतीने महाराष्ट्रातील नेत्यांचे याआधी सहकार्य होतं, तसंच सहकार्य असावं अशी भावना बेळगाव मधील मराठी बांधवानी व्यक्त केली असल्याचे पवार म्हणाले. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मेळाव्याला जाण्यासाठी आमचे नेते जो आदेश देतील तो पाळला जाईल. ज्या कोणत्या नेत्याला बेळगावला जाण्यास सांगतात त्याचे पालन करतील, असे पवार यांनी सांगितले.