पुणे / प्रतिनिधी :
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा लौकिक सत्य कथन करण्यासाठी आहे. त्यांचा आणि पवारसाहेबांचा पूर्वइतिहास तपासल्यास फडणवीसांच्या बोलण्यातच खरेपणा आहे, असे वाटते, अशा शब्दांत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे बुधवारी टीकास्त्र सोडले.
संघ पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर ते बोलत होते. बावनकुळे म्हणाले, मी देवेंद्र फडणवीस यांना अनेक वर्षांपासून ओळखतो. देवेंद्र फडणवीस हे राजकारणाकरिता तसेच स्वतःची खुर्ची वाचविण्यासाठी किंवा मिळविण्यासाठी कधीच असत्य कथन करीत नाहीत. खोटे बोलून राजकारण करणे, हा देवेंद्र फडणवीस यांचा स्वभाव नाही. परिणामी अनेक वेळा त्यांचे नुकसान झाले आहे. गंगाधर फडणवीस यांचे त्यांच्यावर संस्कार आहेत, त्यामुळे ते कधीही असत्य विधान करू शकत नाही. ते त्यांच्या रक्तात नाही. 2014 ते 2019 दरम्यान देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होते. त्याकाळात विरोधी पक्षाच्या नेत्यांबाबत कधीही सूड भावनेने त्यांनी काम केले नाही. उलट फडणवीस यांच्यासोबत दगा झाला. आताही जे घडले असेल, तेच त्यांनी सांगितले असणार. ज्यांच्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी विधान केले आहे, त्यांचा इतिहास सर्वांना ज्ञात आहे, अशी कोपरखळीही त्यांनी पवार यांना उद्देशून मारली.
अधिक वाचा : धनंजय मुंडेंच्या नावाने मंत्रालयात बोगस भरती
त्यांनी आमचे ऐकले नाही
कसबा आणि चिंचवड या दोन्ही निवडणुका बिनविरोध झाल्या पाहिजे, अशी विनंती महाविकास आघाडीला मागितली होती. शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या निवेदनानंतर आम्ही तातडीने चर्चा करून अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध केली. आम्ही त्यांचे अंधेरीत ऐकले, पण त्यांनी आमचे या निवडणुकीत ऐकले नसल्याचे सांगत बावनकुळे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांबद्दल नाराजी व्यक्त केली.