मुंबई / वृत्तसंस्था
रिषभ पंतला क्रिकेटच्या रेकॉर्ड बुकमध्ये स्थान संपादन करायचे असेल तर त्याने 100 कसोटी सामने खेळण्यावर लक्ष केंद्रित करणे योग्य ठरेल, असे मत भारताच्या महान मॅचविनर्सपैकी एक असलेल्या विरेंद्र सेहवागने मांडले. कसोटी क्रिकेटमध्ये दोन त्रिशतके झळकावणारा भारताचा एकमेव क्रिकेटपटू असलेल्या सेहवागचा 100 पेक्षा अधिक कसोटी खेळत 8500 पेक्षा अधिक धावा जमवणाऱया 11 भारतीय खेळाडूंत समावेश होतो.
तूर्तास, रिषभ पंत हा ऑस्ट्रेलिया, इंग्लंड व दक्षिण आफ्रिकेमध्ये कसोटी शतके झळकावणारा एकमेव भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज असून त्याने 30 कसोटी सामन्यात 40.85 च्या सरासरीने 1920 धावा जमवल्या आहेत.
‘रिषभ पंतने 100 पेक्षा अधिक कसोटी सामने खेळले तर तो रेकॉर्ड बुकमध्ये सहज स्थान संपादन करेल, याबाबत माझ्या मनात अजिबात शंका नाही’, असे सेहवागने येथे स्पोर्ट्स-18 वेबसाईटशी बोलताना नमूद केले. ‘टी-20 व वनडे क्रिकेटमध्ये जे जलद डाव साकारले जातात, ते ठीक आहे. पण, प्रदीर्घ दृष्टिकोनातून विचार करता, कसोटी क्रिकेटमध्ये जे योगदान दिले जाते, तेच अधिक काळ संस्मरणात ठेवले जाते’, असे सेहवाग म्हणाला.
‘विराट कोहली मर्यादित षटकांच्या क्रिकेट प्रकारापेक्षाही कसोटी क्रिकेट खेळण्यावर अधिक लक्ष केंद्रित करतो, याचे कारण हेच आहे. जर 100-150 किंवा अगदी 200 कसोटी सामने खेळले तर रेकॉर्ड बुकमधील आपले स्थान अढळ असेल, याची त्यालाही उत्तम कल्पना आहे’, याचा विरुने शेवटी उल्लेख केला.