केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी मणिपूरमध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील चौकशी समितीची घोषणा केली आहे. या समितीकडून जीवितहानी आणि मालमत्तेच्या झालेल्या नुकसानीवर प्रकाश टाकला जाईल. तसेच मणिपूरमध्ये घडलेल्या महत्वाच्या 6 हिंसाचाराशी संबंधित प्रकरणांची विशेष सीबीआय पथकाद्वारे चौकशीही केली जाईल, असे अमित शाह यांनी जाहीर केले. ईशान्य राज्याच्या तीन दिवसांच्या दौऱ्यानंतर अमित शहांनी ही घोषणा केली. तसेच एसओओ कराराचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्याचे सांगून दंगेखोरांनी आपल्या शस्त्रांसह समर्पण करण्याचे आवाहन गृहमंत्र्यांनी केले.
आपल्या आवाहनात गृहमंत्री अमित शहा म्हणाले, “आपण समाजातील प्रत्येक घटकाबरोबर अनेक बैठका घेतल्या, अनेक अधिकारी, राजकीय पक्ष तसेच कुकी आणि मेईती या जमातींच्या नागरी गटांच्या प्रतिनिधींशीही चर्चा केली आहे. हिंसेची प्रमुख कारणे शोधण्यासाठी आणि त्याला कोण जबाबदार आहेत याची पडताळणी करण्यासाठी एक चौकशी समिती स्थापन केली जाणार आहे. या चौकशी समितीचे नेतृत्व उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीच्या दर्जाचे निवृत्त न्यायाधीश करतील. ही चौकशी केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे.” असेही अमित शहा यांनी सांगितले आहे.
तसेच मणिपूरच्या राज्यपालांच्या मार्गदर्शनाखाली एक शांतता समिती स्थापन केली जाईल, परिस्थिती व्यवस्थापित करण्यासाठी राज्यात तैनात असलेल्या एजन्सींमधील समन्वयावर देखरेख ठेवेल.” अशीही घोषणा केंद्रीय गृहमंत्र्यांनी केली.