एल अॅण्ड टीचे अधिकारी धारेवर : पालकमंत्र्यांनी स्वतंत्र बैठक घेण्याचे केले जाहीर
बेळगाव : पावसाचा पत्ता नाही. यातच शहरामध्ये पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. यामुळे सर्वसामान्य जनता अक्षरश: त्रासली आहे. याचे पडसाद पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत उमटले. महानगरपालिकेमध्ये बुधवारी आढावा बैठक घेतली. यावेळी एलअॅण्डटी कंपनीच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरण्यात आले. पाणी समस्या सुरळीत करा, अन्यथा तुमचा गाशा गुंडाळा, अशी सक्त ताकीद यावेळी त्यांना देण्यात आली आहे. पालकमंत्र्यांनी यासाठी स्वतंत्र बैठक घेण्याचे जाहीर केले.
पाणी समस्या गंभीर
शहरामध्ये पाणी समस्या गंभीर बनत चालली आहे. याला सर्वस्वी एलअॅण्डटी कंपनीच जबाबदार असल्याचा थेट आरोप नगरसेवकांबरोबरच सर्वसामान्य जनतेने केला. तब्बल 15 ते 20 दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे या कंपनीचे काम कसे चालले आहे, याचा विचार करावा. पाणी समस्येबाबत या कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता उद्धट उत्तरे दिली जातात. गेल्या तीन वर्षांपासून ही कंपनी शहराच्या पाणीपुरवठा योजनेशी संलग्न आहे. मात्र तेव्हापासून शहरातील पाणीपुरवठाच पूर्णपणे कोलमडला आहे, असा आरोप आमदार राजू सेठ यांनी केला. यावेळी महिला आणि बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनीही या अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले. रात्रीच्यावेळी पंधरा दिवसांतून केवळ एक तास पाणीपुरवठा होत आहे. या प्रकारामुळे महिलांच्या तणावामध्ये वाढ झाली आहे. पाण्यासाठी रात्रभर जागरण करावी लागते. स्मार्ट सिटीमध्ये समावेश झाला आहे म्हणून आम्ही छातीठोकपणे सांगत आहे. मात्र पाणीच नाही तर स्मार्ट सिटी घेऊन काय करायची? असा प्रश्न महिला नगरसेविकांनी पालकमंत्र्यांकडे उपस्थित केला. पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी याबाबत एलअॅण्डटीच्या अधिकाऱ्यांना खुलासा करावा, अशी सूचना केली. यावर केवळ थातूरमातूर उत्तरे कंपनीने दिली. येत्या पाच दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करू, असे सांगितले. यावर आमदार राजू सेठ यांनी गेल्या वर्षभरापासून तुमच्याकडून पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. आता पाच दिवसांत तुम्ही कसा पाणीपुरवठा सुरळीत करणार, असा प्रतिसवाल केला.
अधिकाऱ्यांवर अक्षरश: प्रश्नांचा भडीमार
पाणीपुरवठा करण्यासाठी पाईप घालताना एलअॅण्डटी कंपनीने बऱ्याच रस्त्यांवरील पेव्हर्स बाजूला काढून ठेवले आहेत. तर काही ठिकाणी रस्ता खोदाई करून पाईप घातले आहेत. त्यानंतर त्याकडे दुर्लक्ष केले आहे. आता ते ख•s तसेच आहेत. त्यामध्ये पडून अनेकजण जखमी होत आहेत. एलअॅण्डटीला विचारले असता ते ख•s बुजविण्याची जबाबदारी स्मार्ट सिटीची असल्याचे सांगत आहेत. तर स्मार्ट सिटीचे अधिकारी त्याच्याशी आमचा कोणताही संबंध नाही, त्यांनीच दुरुस्ती केली पाहिजे, असे सांगत आहेत. यामुळे शहराची वाताहत झाल्याचा आरोप उपस्थित असलेल्या जनतेने केला. एलअॅण्डटी कंपनीच्या अधिकाऱ्यांवर अक्षरश: प्रश्नांचा भडीमार केला. त्यांच्याशी सर्व करार रद्द करून दुसऱ्या कंपनीला द्या, अशी मागणी अनेकांनी केली. पालकमंत्री जारकीहोळी यांनी यासाठी स्वतंत्र बैठक बोलावून योग्य तो तोडगा काढण्यात येईल, असे सांगितले. यासाठी लवकरच नगरसेवक तसेच आमदारांची पुन्हा बैठक घेतली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
कूपनलिकांची तातडीने दुरुस्ती करा
शहरामध्ये पाणी समस्या गंभीर बनत चालली आहे. त्यामुळे सध्या शहरातील सर्वच कूपनलिकांची तातडीने दुरुस्ती करा, अशी सूचना पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी अधिकाऱ्यांना केली आहे. शहरातील अनेक कूपनलिका बंद आहेत. याचबरोबर विहिरींचे पाणीही कमी झाले आहे. त्यामुळे विहिरींमधील गाळ काढावा आणि सर्वसामान्य जनतेला पाणी उपलब्ध करून द्यावे, असेदेखील पालकमंत्र्यांनी सांगितले.