पुणे / प्रतिनिधी :
एखाद्या मंत्र्याकडून वारंवार एकच चूक होत असेल, तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्याबाबत विचार करतील, अशी प्रतिक्रिया उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मंगळवरी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
पाटील म्हणाले, शिवसेना ही आज पहिल्यांदा फोडली का? शिवसेनेतून भुजबळांना, गणेश नाईक, नारायण राणे यांना कोणी बाहेर काढले? महाराष्ट्रात आमदार फोडण्याची, खरेदी करण्याची संस्कृती कोणी सुरू केली? त्यावेळी ‘खोका’ नव्हता, तर ‘पेटी’ शब्द होता. त्यावेळी त्यांना ‘पेटय़ा’ दिल्या असतील. जनतेला असले प्रकार आवडत नाहीत, विकासावर बोला अशी जनतेची आजकाल मागणी आहे. त्यामुळे सगळय़ाच राजकीय पक्षांना आता याबाबत विचार करण्याची वेळ आली आहे. शिंदे यांच्या मंत्र्यांना ‘खोके’ या विषयात लक्ष्य केले जात आहे. अब्दुल सत्तार यांनी केलेल्या वक्तव्याला कोणाची सहमती नाही. सत्तारांनी माफी मागावी, असे मुख्यमंत्र्यांनीही त्यांना सांगितले आहे. त्याप्रमाणे माफी मागितलीही गेली. त्यामुळे दिलगिरी व्यक्त केल्यानंतर विषय संपवला पाहिजे. अर्थात एखादा मंत्री वारंवार तीच चूक करत असेल, तर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री त्याबाबत विचार करतील.
अधिक वाचा : साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवृत्त न्या. नरेंद्र चपळगावकर
राज्यातील राजकीय संस्कृती हा मोठा चिंतेचा विषय झाला आहे. एखाद्या विषयावर वक्तव्य करणे, मत देणे, त्यावर प्रतिक्रिया देणे आणि त्यांना प्रसारमाध्यमांनी किती महत्त्व द्यायचे, हादेखील विषय महत्त्वाचा आहे. अशी राजकीय संस्कृती हा मोठा चिंतेचा विषय झाला आहे. काय बोलायचे, कसे वागायचे याची एक आचारसंहिता सगळय़ा पक्षांनी एकत्र बसून बनवायला हवी, असे मला वाटते. कोणीतरी हे बनवण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे मत पाटील यांनी मांडले.
सन 2014-19 या काळात भाजपची सत्ता असताना पक्षांतर्गत एकदाही बंड झाले नाही किंवा मुख्यमंत्री बदला, असे सांगत कोणी दिल्लीतही गेले नाही. फडणवीसांनी त्यांचे सक्षम नेतृत्त्व सिद्ध केले आहे. सक्षम नेता पक्षाला एका दिशेने नेत असतो, तसे शिवसेनेत झाले नाही म्हणूनच घुसमट होऊन शिंदे बाहेर पडले, असा दावा त्यांनी केला.