पुणे / प्रतिनिधी :
जनुकीय विज्ञानाच्या क्षेत्रात सखोल ज्ञान प्राप्त करणे गरजेचे असून, पुढील पिढय़ांच्या कल्याणासाठी हे आवश्यक आहे, अशी अपेक्षा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केली.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकच्या (एमयुएचएस) पुणे विभागीय केंद्राने उभारलेल्या डॉ. घारपुरे स्मृती जेनेटिक प्रयोगशाळा व कर्करोग संशोधन केंद्राचे (जीन हेल्थ) उद्घाटन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्ट. जन. माधुरी कानिटकर (से. नि.), राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, इंडियन ड्रग रिसर्च असोसिएशन ऍण्ड लॅबारेटरीचे चेअरमन सुहास जोशी, विद्यापीठाचे प्रति कुलगुरू डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ आदी उपस्थित होते.
अधिक वाचा : सेट परीक्षा 26 मार्चला
सर्व नवीन ज्ञान हे अंतिमत: प्रयोगशाळेत निर्माण होते, अशी आपली भावना असल्याचे सांगून राज्यपाल म्हणाले, पूर्वी वैद्य प्राचीन वैद्यकीय ज्ञानाचा वापर करून स्वत: निदान करायचे आणि स्वत:च औषधे बनवायचे. आता आधुनिक ऍलोपॅथी उपचार पद्धतीत औषध निर्माते, निदान प्रयोगशाळा, विशेषज्ञ डॉक्टर्स, औषधे, उपचार साधने यासाठी वेगवेगळय़ा यंत्रणा अशी एक साखळी आहे. परंतु, या साखळीमध्ये सर्वात महत्त्वाची बाब आहे म्हणजे येथे होत असलेले शोध, नाविन्य, संशोधन आहे. या आरोग्य विज्ञानातील प्रारंभिक बाबी आहेत. यानंतर डॉक्टर निदान आणि त्याआधारे उपचार करतात.
आरोग्य क्षेत्रातील संशोधन, आजारांचा शोध, रोगनिदान आणि उपचारपद्धतीचा शोध आदी बाबी तपश्चर्या आणि खूप कालावधीची प्रक्रिया आहे. त्यासाठी मोठा संयम, सहकार्य, समर्पणाची आवश्यकता असते. जनुकविज्ञानाच्या (जेनेटिक सायन्स) माध्यमातून केवळ आजारांचे निदान करणे एवढेच नव्हे, तर आजारांची कारणे आणि त्यावरील उपचार शोधणे आदी सर्व बाबी करून भविष्यातील अनेकाअनेक पिढय़ा वाचवण्याचे अत्यंत पवित्र काम केले जात आहे. आगामी काळातही यात अधिकचे ज्ञान प्राप्त करणे आवश्यक आहे.