बैलजोड्यांची संख्या कमी असल्याने टॅक्टरच्या साहाय्याने हंगाम साधण्यात शेतकरी मग्न
वार्ताहर/ काकती
काकती शिवारात खरीप हंगाम साधण्यासाठी धूळवाफ भातपेरणीला गेल्या चार दिवसांपासून सुरुवात झाली आहे. बैलजोडीची संख्या कमी असल्याने ट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरणीचा हंगाम साधण्यात शेतकरी वर्ग मग्न झाला आहे.
यंदा वळिवाचा पाऊस मोजकाच झाला असून पेरणीपूर्व मशागतीची कामे झाली आहेत. रोहिणी नक्षत्रातही पाऊस साधारण झाला असून मृग नक्षत्रात दमदार पाऊस होईल. या आशेवर शेतकरी आहे. शिवारात 15 टक्के धूळपेरा झाला असून मृगाचा दमदार पाऊस होताच बहुसंख्येने शेतकरी ओलीतच पेरा साधण्यासाठी तयारीत आहे. बियाणांची व रासायनिक खताची तजवीज शेतकरी करीत आहे.
गुरुवार दि. 8 पासून सूर्यदेवाने मृग नक्षत्रात प्रवेश केला आहे. मृग नक्षत्राचे वाहन हत्ती असून येत्या 15 तारखेपर्यंत मृगाच्या पावसाला दमदार सुरुवात होईल, असा अंदाज शेतकरी वर्ग पंचांगावरून बांधत आहे. हवामानात बदल झाला असून मान्सूनचे जोरदार वारे वाहू लागले आहेत. आकाशात ढगांची वस्ती वाढू लागली आहे. उन्ह सावलीचा खेळ चालू आहे.
मृगाचा पाऊस होताच रोप लागवडीसाठी भाताची घालणी टाकणार आहेत. रानमाळावरील भुतरामट्टी, जुमनाळ, कारावी, हग्गेरी, व्हसा वंटमुरी आदी ठिकाणी कापसाच्या बियाणांची टोकन पद्धतीने पेरणी करण्यात आली. कापसीच्या उगवणीकरिता मृगाच्या पावसाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. निसर्गाने पेरणी करण्याचे संकेत दिले आहेत. हवामानातील बदलावरून शेतकऱ्यांना समजू लागले आहे.