सरकारचे कोट्यावधी रुपये पाण्यात : ग्रामपंचायतींचे जलशुद्धीकरण यंत्रणेकडे साफ दुर्लक्ष, यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी
जांबोटी : ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा, या उद्देशाने राज्य सरकारच्यावतीने कोट्यावधी ऊपये खर्च करून बसविण्यात आलेली जलशुद्धीकरण यंत्रणा कुचकामी ठरल्या आहेत. या यंत्रणा बंद पडल्यामुळे शासनाचे कोट्यावधी ऊपये पाण्यात गेले आहेत. या यंत्रणांची ग्रामपंचायतीने देखभाली करावयाच्या होत्या. मात्र ग्रामपंचायतीने या जलशुद्धीकरण यंत्रणेकडे साफ दुर्लक्ष केल्याने तालुक्यातील सर्वच गावात या यंत्रणा आता शोभेच्या वस्तू बनून राहिल्या आहेत. उन्हाळा सुरू झाल्याने ग्रामीण भागातील शुद्ध पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने याबाबत गांभीर्याने दखल घेऊन या जलशुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वित कराव्यात, अशी मागणी ग्रामीण भागातील जनतेतून होत आहे.
पंचायत राज आणि ग्रामीण विकास खात्याच्यावतीने ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे व नागरिकांचे आरोग्य व्यवस्थित राहावे या उद्देशाने गेल्या सात-आठ वर्षांपूर्वी प्रत्येक गावात जलशुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती. केवळ एक ऊपयांमध्ये नागरिकांना 20 लिटर शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याची सरकारची योजना होती. प्रत्येक गावातील मध्यवर्ती ठिकाणी नागरिकांना सोयीस्कर होईल, अशा ठिकाणी गावातील नळपाणी योजनेद्वारे सदर जलशुद्धीकरण यंत्रणेला पाणीपुरवठा करण्यात येत होता. प्रत्येक गावातील जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित करून, त्याद्वारे शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याची जबाबदारी त्या-त्या गावच्या ग्राम पंचायतींवर सोपविण्यात आली होती. मात्र अयोग्य नियोजन व योग्य देखभालीअभावी सदर जलशुद्धीकरण यंत्रणेद्वारे होणारा शुद्ध पाण्याचा पुरवठा नागरिकांना केवळ प्रारंभी काही दिवस सुरू राहिला. त्यानंतर जलशुद्धीकरण यंत्रणेत उद्भवणाऱ्या तांत्रिक समस्या तसेच जलशुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वित करण्याकडे संबंधित ग्राम पंचायतींचे दुर्लक्ष झाल्यामुळे केवळ काही दिवसातच जलशुद्धीकरण यंत्रणा कुचकामी ठरल्या. त्यामुळे या यंत्रणेसाठी सरकारच्यावतीने खर्च केलेले कोट्यावधी ऊपये पाण्यात वाहून गेल्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
सध्या उन्हाळ्याच्या दिवसांत नदी, नाले, विहिरी, कूपनलिका आदींमधील पाण्याची पातळी कमी होत असून, पाण्यात मिसळणारा पालापाचोळा तसेच इतर वस्तूंमुळे पाणी दिवसेंदिवस अशुद्ध बनत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. नागरिकांचे आरोग्य सुस्थितीत राखण्यासाठी शुद्ध पाणीपुरवठ्याची आवश्यकता आहे. तरी पंचायत राज व ग्रामीण विकास खात्याच्या अधिकारी वर्गाने लक्ष घालून प्रत्येक गावातील बंद पडलेले जलशुद्धीकरण केंद सुरू करून शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.