प्रतिनिधी /बेळगाव
पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले जाते. मात्र, उज्ज्वलनगर परिसरात व्हॉल्वद्वारे हजारो लिटर पाणी वाया जात असून राष्ट्रीय महामार्गाच्या सर्व्हिस रस्त्यावर पाण्याचे तळे साचत आहे. याबाबत एलऍण्डटी कंपनीकडे तक्रार करूनही दखल न घेण्यात आल्यामुळे पाण्याचा अपव्यय होत आहे.
पाण्यासाठी नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. पाणीपुरवठा सुरळीत झाला नसल्यास नागरिकांना भटकंती करण्याची वेळ येते. पाणी जपून वापरा, असे आवाहन एलऍण्डटी कंपनी आणि महापालिकेकडून केले जाते. मात्र, ठिकठिकाणी लागलेल्या गळतीद्वारे मोठय़ा प्रमाणात पाणी वाया जात असून एलऍण्डटी कंपनीकडूनच पाणी वाया घालविण्याचा प्रकार सुरू आहे. उज्ज्वलनगर परिसरात सर्व्हिस रस्त्याशेजारी जलवाहिनीचा व्हॉल्व खराब झाला आहे. या भागात पाणीपुरवठा सुरू केल्यास निम्मे पाणी या व्हॉल्वमधून रस्त्यावरून वाहत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा करण्यात आल्यानंतर सर्व्हिस रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात पाणी वाहते. संपूर्ण रस्ता पाण्याखाली जातो. त्यामुळे वाहनधारकांनादेखील रस्त्यावरून जाताना अडचण निर्माण होत आहे.
दुरुस्ती करण्याची मागणी
पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होत असून दुरुस्तीकडे कानाडोळा करण्यात आला आहे. रस्त्यावर पाण्याचे तळे साचत असून या प्रकाराबद्दल नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. व्हॉल्वच्या गळतीमुळे परिसरातील रहिवाशांना मुबलक आणि उच्च दाबाने पाणी मिळत नाही. त्यामुळे पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. येथील व्हॉल्वची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.