नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगला देशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी भारतातून बांगला देशपर्यंतच्या डिझेल पाईपलाईनचे उद्घाटन केले आहे. या पाईपलाईन मधून भारत बांगला देशला डिझेलचा पुरवठा करणार आहे. या प्रकल्पामुळे दोन्ही देशांमधील ऊर्जासंबंध अधिक बळकट होणार आहेत.
या पाईपलाईनमुळे भारत आणि बांगला देशाच्या परस्पर मैत्रीसंबंधाच्या नव्या अध्यायाचा प्रारंभ होणार आहे. सध्या भारत बांगला देशला 512 किलोमीटरच्या मार्गावरुन डिझेलचा पुरवठा करतो. मात्र, या पाईपलाईनमुळे हे अंतर या 131.5 किलोमीटर लांबीच्या पाईपलाईनमुळे जवळपास चारशे किलोमीटर कमी होणार आहे. त्यामुळे ही पाईपलाईन महत्वाची मानली गेली आहे. या प्रकल्पाला 377 कोटी रुपये खर्च आला आहे. यातून भारतातून उत्तर बांगला देशला प्रतिवर्ष 10 लाख टन डिझेलचा पुरवठा केला जाईल. ही पाईपलाईन पश्चिम बंगालमधींल सिलिगुडी मार्केटिंग केद्रातून सुरु होऊन नुमालीगढ येथील तेलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणि तेथून बांगला देशातील प्रभातीपूर डेपोपर्यंत पोहचणार आहे. यामुळे डिझेलच्या वाहतुकीचा खर्च निम्म्याहून अधिक प्रमाणात वाचणार आहे.