प्रतिनिधी /सांगे
कलरकॉन एशिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने ग्रामीण भागांचा विकास करण्याचा जो विडा उचलला आहे त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ग्रामीण भागांच्या विकासाबरोबरच तेथील ग्रामस्थांचे राहणीमानही उच्च स्तरावर नेण्यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन कलरकॉन इंडियाचे व्यवस्थापक राजेश परब यांनी मानगाळ येथे नूतनीकरण केलेल्या अंगणवाडीचे उद्घाटन करताना केले.
यावेळी मनीष हंडा, संकेत खडपकर कृपाल राऊत देसाई, मार्पुस रॉड्रिग्स, रुचिता गावस, राज वैद्य, पंच राजेंद्र फळदेसाई, विकास कुलकर्णी व इतर मान्यवर उपस्थित होते. कलरकॉन कंपनीने ग्रामीण भागांत आजवर अनेक प्रकल्प पूर्ण केले आहेत. यामध्ये कूपनलिका, बायो-टॉयलेट, पाण्याचे प्रकल्प पूर्ण केले आहेत. या कंपनीची आरोग्य एक्सप्रेस बस ग्रामीण भागांत जाऊन आरोग्य सेवा देत आहे. या कंपनीने नेत्रावळी येथील दुर्गामाता वसतिगृहाचे लाखो रुपये खर्च करून नूतनीकरण केले आहे तसेच नडके, खोतीगाव व कावरेपिर्ला येथे पाण्याचे प्रकल्प उभारून ग्रामस्थांसाठी पाण्याची सोय केली आहे, अशी माहिती याप्रसंगी देण्यात आली.